देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण आवृत्तीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला शनिवारी नवे वळण मिळाले. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पण गीतगायन सुरू असतानाच सोनिया गांधी संतापल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यांच्या संतापामागील कारण काय होते याबद्दल कुतुहल होते.
काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान संपूर्ण ‘वंदे मातरम्’ वाजवण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या व्हिडिओवर काही वापरकर्त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ थांबवण्याचा इशारा केल्याचा दावा केला. वंदे मातरमचे गायन सुरू असताना सोनिया गांधी या राहुल गांधींना काहीतरी सांगत होत्या. नंतर तिथे उभा असलेला एक कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संवाद साधला. दुसरा कार्यकर्ताही तिथे आला. सोनिया गांधी नाराज असल्याचे त्या व्हीडिओत दिसते आहे. संपूर्ण वंदेमातरमला सोनिया गांधी विरोध करत असल्याचा आरोप केला गेला. काँग्रेसने यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसकडून या दाव्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. सोनिया गांधी ‘वंदे मातरम्’ थांबवण्यास सांगत नव्हत्या, तर त्या खर्गे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. ध्वजारोहणाच्या वेळी खर्गे उभेच होते.
हे ही वाचा:
चीनच्या बाजारात भारतीय वस्तूंची मागणी वाढली
‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक
मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!
रात्री स्क्रोलिंगची सवय ठरतेय झोपेची शत्रू
‘वंदे मातरम्’वरून देशात राजकीय वाद
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ सध्या देशातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी सरकारी कार्यक्रम, शाळा आणि प्रमुख राष्ट्रीय समारंभांमध्ये गायली जावीत, अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त वर्षभराच्या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
मात्र काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. भाजपकडून राष्ट्रीय प्रतीकाचे राजकीयीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यालयातच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले गेल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
लाल किल्ल्यावरही संपूर्ण ‘वंदे मातरम्’
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्यावरही संपूर्ण ‘वंदे मातरम्’ वाजवण्यात आले. लष्कराच्या बँडने ‘वंदे मातरम्’ सादर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले. यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमातही ‘वंदे मातरम्’ला विशेष स्थान देण्यात आले.
‘वंदे मातरम्’चा स्वातंत्र्यलढ्याशी संबंध
‘वंदे मातरम्’ची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. हे गीत पुढे त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ प्रथम स्वतंत्रपणे रचले गेले होते. त्यानंतर ‘आनंदमठ’मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले.
१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीविरोधातील आंदोलनाच्या काळात ‘वंदे मातरम्’ हा राजकीय घोष म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरला गेला. सरकारी माहितीनुसार, ७ ऑगस्ट १९०५ रोजी ‘वंदे मातरम्’चा राजकीय घोष म्हणून वापर झाल्याचा उल्लेख आढळतो.
