भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या शानदार फॉर्ममुळे अलीकडेच माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी भुवनेश्वरला पुन्हा भारतीय टी-२० संघात संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, भुवनेश्वरने राष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
आरसीबीकडून खेळताना भुवनेश्वरने यंदाच्या हंगामात २१ विकेट्स घेतल्या आहेत. पॉवरप्लेपासून डेथ ओव्हर्सपर्यंत त्याची अचूक आणि प्रभावी गोलंदाजी संघासाठी मोठा आधार ठरत आहे.
आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ३६ वर्षीय भुवनेश्वर म्हणाला, “मी भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विचार करत नाही. अनेक वर्षांपूर्वीच मी दीर्घकालीन लक्ष्य ठेवणे बंद केले. कारण जेव्हा जेव्हा मी अशी ध्येयं ठरवली, तेव्हा ती माझ्यासाठी फारशी उपयोगी ठरली नाहीत.”
आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी त्याच्या पुनरागमनाची बाजू मांडली होती. मात्र, भुवनेश्वरने सांगितले की तो आपल्या कारकिर्दीच्या सध्याच्या टप्प्यावर समाधानी आहे.
तो म्हणाला, “२०० सामने, इतक्या विकेट्स… हे सर्व गेल्या अनेक वर्षांतील मेहनतीचे फळ आहे. चांगले आणि वाईट दोन्ही काळ पाहिले आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर, सध्या मला याबद्दल काही विशेष वाटत नाही. पण भविष्यात क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर या आठवणींचे महत्त्व नक्की जाणवेल.”
भुवनेश्वरने पुढे सांगितले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने खेळावे लागत नसल्याने त्याला स्वतःचा वर्कलोड व्यवस्थित सांभाळता येत आहे.
तो म्हणाला, “देशासाठी खेळणे थांबल्यानंतरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयपीएलनंतर मला भरपूर विश्रांती मिळते. फिट आणि टचमध्ये राहण्यासाठी मी पुरेसे क्रिकेट खेळतो आणि इतर गोष्टींसाठीही वेळ मिळतो.”







