कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली. ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्राने ८५.८३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक पटकावले, तर यशवीर सिंहने ८५.४१ मीटर अंतर गाठत कांस्यपदक आपल्या नावावर केले. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिराजाने ८९.७५ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर कब्जा केला.
नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८०.९७ मीटर भालाफेक केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८५.८३ मीटर अंतर गाठत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८१.२९ मीटर आणि ८०.७३ मीटर अंतर गाठले. मात्र, श्रीलंकेच्या पथिराजाच्या दमदार ८९.७५ मीटर फेकीमुळे नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यशवीर सिंहनेही स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ७८.५५ मीटर, तर तिसऱ्या प्रयत्नात ८१.३३ मीटर अंतर गाठले. पाचव्या प्रयत्नात ७६.९५ मीटर भालाफेक केल्यानंतर अखेरच्या आणि निर्णायक प्रयत्नात ८५.४१ मीटर अंतर गाठत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे ही त्याच्या कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोत्तम (Personal Best) कामगिरी ठरली.
भारताचा आणखी एक खेळाडू रोहित यादव याने ८१.५६ मीटर अंतरासह सातवे स्थान मिळवले.
या दुहेरी यशामुळे भारताच्या पदकसंख्येत भर पडली असून, कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या खात्यात आता एकूण २३ पदके जमा झाली आहेत. यामध्ये ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.
अॅथलेटिक्स आणि पॅरा-अॅथलेटिक्समध्ये भारताने आतापर्यंत ११ पदके जिंकली आहेत. याशिवाय जुडोमध्ये ३ पदके (२ सुवर्ण), वेटलिफ्टिंगमध्ये ८ पदके, तर पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये १ कांस्यपदक मिळाले आहे. भारत सध्या पदकतालिकेत दहाव्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया १२८ पदकांसह अव्वल, इंग्लंड ८० पदकांसह दुसऱ्या, तर कॅनडा ५३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.







