इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. लॉर्ड्स येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, अशा वृत्तांनंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी या चर्चांवर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहितवर कोणत्याही प्रकारचे दडपण नसल्याचे स्पष्ट करत त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
कार्डिफ येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोटक यांना रोहितवरील दबाव आणि निवृत्तीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूवर कोणत्याही प्रकारचे दडपण असू शकत नाही. तो इतका अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू आहे की अशा गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होणार नाही.” ते पुढे म्हणाले की, रोहितला पहिल्या दोन सामन्यांत धावा करता आल्या नाहीत, पण त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. लॉर्ड्समध्ये तो मोठी खेळी करू शकतो, असा त्यांना विश्वास आहे.
कोटक यांनी रोहितच्या फॉर्मबाबतही भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते, रोहित “संघर्ष करत आहे” असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यांनी सांगितले की, इंग्लंडमधील खेळपट्टीवर चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उसळत असल्याने रोहितला त्याच्या आवडीचे शॉट्स खेळणे कठीण गेले. दुसरीकडे शुभमन गिल आणि विराट कोहली यांना सुरुवातीलाच लय मिळाली, मात्र रोहितला तसे सापडले नाही. कोटक म्हणाले की, अशा गोष्टी क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांसोबत घडतात आणि त्यामुळे त्याला खराब फॉर्म म्हणणे योग्य नाही.
निवृत्तीच्या चर्चांना उधाण का?
अलीकडेच काही माध्यमांनी असा दावा केला की, निवड समितीने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आता युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून रोहित शर्मा भविष्यातील योजनांमध्ये नसल्याचे त्याला सांगण्यात आले आहे. या वृत्तांनुसार, इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो. मात्र बीसीसीआय किंवा निवड समितीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
हे ही वाचा:
भेसळीवर FDAचा राज्यभर धडाका; पारशी डेअरीचा परवाना निलंबित
अमेरिकेत पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य नितीश कौशल अटकेत
चर्चेचे दरवाजे खुले ठेवून अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच
‘आम्हाला काहीच फुकट मिळालेलं नाही’!
अहवालांनुसार, निवड समिती २०२७ विश्वचषकाच्या तयारीसाठी यशस्वी जैस्वालसारख्या युवा फलंदाजांना अधिक संधी देण्याच्या विचारात आहे. मात्र, एखादा खेळाडू कधी निवृत्त होणार याचा अंतिम निर्णय स्वतः त्या खेळाडूचाच असतो, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आता केवळ मालिकेच्या निकालासाठीच नव्हे, तर रोहित शर्माच्या भवितव्याच्या दृष्टीनेही चर्चेचा विषय ठरला आहे. रोहित या सामन्यात मोठी खेळी करून सर्व चर्चांना पूर्णविराम देतो की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
