जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने इतिहास रचत प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. पारस डोगरा यांच्या नेतृत्वाखाली संघाने ८ वेळा विजेतेपद मिळवलेल्या बलाढ्य कर्नाटक संघावर मात करत सुवर्णक्षण साकारले.
डी. आर. बेंद्रे क्रिकेट स्टेडियम, हुबळी येथे झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजेता घोषित करण्यात आले. सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातील भक्कम आघाडीमुळे किताब जम्मू-काश्मीरच्या नावावर गेला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात तब्बल ५८४ धावांचा डोंगर उभारला. शुभम पुंडीर (१२१), यावर हसन खान (८८), साहिल लोट्रा (७२), कन्हैया वधावन (७०) आणि कर्णधार पारस डोगरा (७०) यांनी दमदार खेळी साकारली.
प्रत्युत्तरात कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांत आटोपला. कर्णधार मयंक अग्रवाल यांनी १६० धावांची झुंजार खेळी केली; मात्र त्यांना साथ मिळाली नाही.
जम्मू-काश्मीरकडून औकिब नबी यांनी ५ बळी घेतले, तर सुनील कुमार आणि युधवीर सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. साहिल लोट्रा यांनी १ गडी बाद केला.
पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात जम्मू-काश्मीरने ४ बाद ३४२ धावा करून डाव घोषित केला. सुरुवातीला ११ धावांवर २ गडी गमावूनही संघाने दमदार पुनरागमन केले.
सलामीवीर कामरान इक्बाल १६० धावांवर नाबाद राहिला, तर साहिल लोट्रा १०१ धावांवर नाबाद राहिला. दोघांनी मिळून १९७ धावांची नाबाद भागीदारी रचली. साहिलचे शतक पूर्ण होताच कर्णधाराने डाव घोषित केला.
सामनावीर पुरस्कार शुभम पुंडीर यांना, तर स्पर्धावीर पुरस्कार औकिब नबी यांना देण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या या ऐतिहासिक विजयाने भारतीय क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.







