आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास लीग स्टेजमध्येच संपला. १४ सामन्यांत केवळ ६ विजय मिळवत पाच वेळच्या चॅम्पियन संघाला सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. दुखापती, खराब फॉर्म आणि अनुभवी खेळाडूंची कमतरता यामुळे सीएसकेचा संपूर्ण हंगाम विस्कळीत झाला.
१) दुखापतींनी CSK चं कंबरडंच मोडलं
या हंगामात सीएसकेला सर्वात मोठा फटका बसला तो खेळाडूंच्या दुखापतींचा. नॅथन एलिस दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा आयुष म्हात्रेही जखमी झाल्याने संघाचं मोठं नुकसान झालं. खलील अहमद ५ सामने खेळल्यानंतर बाहेर पडला, तर बॅट आणि बॉल दोन्हीने महत्त्वाचं योगदान देणारा जेमी ओव्हरटनही निर्णायक टप्प्यावर संघाबाहेर गेला.
२) CSK ला सर्वाधिक जाणवली धोनीची उणीव
एमएस धोनी मैदानावर नसल्याचा परिणाम सीएसकेच्या खेळावर स्पष्टपणे दिसला. दुखापतीमुळे धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही. विकेटच्या मागून संघाला दिशा देणारा आणि दबावाच्या क्षणी शांत डोक्याने निर्णय घेणारा नेता नसल्याने कर्णधार ऋतुराज गायकवाड अनेकदा असहाय्य दिसला.
३) युवा खेळाडूंनी केली निराशा
सीएसकेने यंदा अनेक युवा खेळाडूंवर मोठी गुंतवणूक केली होती. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मासाठी तब्बल १४.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र हे दोघेही अपेक्षांवर पूर्णपणे अपयशी ठरले. उर्विल पटेललाही संपूर्ण हंगामात फक्त एकच अर्धशतक झळकावता आलं.
४) ब्रेविस आणि ऋतुराजची बॅट शांतच
डेवाल्ड ब्रेविस आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा होती. मात्र दोघेही संघाला तारू शकले नाहीत. ब्रेविसने ११ सामन्यांत फक्त १५१ धावा केल्या आणि एकही अर्धशतक झळकावलं नाही. त्याचा स्ट्राइक रेटही केवळ १२७ राहिला. दुसरीकडे ऋतुराजचा स्ट्राइक रेट १२३.४४ इतकाच राहिला, जो टी-२० क्रिकेटसाठी अत्यंत कमी मानला जातो.
५) अनुभवी गोलंदाजांची मोठी कमतरता
सीएसकेचा गोलंदाजी विभाग यंदा कमकुवत दिसला. खलील अहमद बाहेर गेल्यानंतर वेगवान गोलंदाजीचा अनुभवच संपल्यासारखं झालं. अंशुल कंबोजने सुरुवातीला चमक दाखवली, पण महत्त्वाच्या सामन्यांत तो खूप महागडा ठरला. स्पेन्सर जॉन्सन आणि गुरजपनीत सिंह यांनाही सातत्य राखता आलं नाही. स्पिन विभागात नूर अहमद प्रभाव टाकू शकला नाही आणि धावांवर नियंत्रण ठेवण्यातही अपयशी ठरला.
पाच वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेसाठी हा हंगाम निराशाजनक ठरला. आता पुढच्या आयपीएलपूर्वी संघात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
