आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने नाव कमावणारा बिहारचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याला शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या एका वर्षात वैभवने देश-विदेशात विविध क्रिकेट प्रकारांमध्ये केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींना थक्क केले असून, त्याच्या असाधारण कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे वैभव सध्या दिल्लीमध्ये आहे. त्यामुळेच रांची येथे सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मणिपूरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात तो बिहार संघाचा भाग राहू शकलेला नाही.
विजय हजारे ट्रॉफी २०२५–२६ मधील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ८४ चेंडूंमध्ये १९० धावांची तडाखेबाज खेळी साकारली होती. या डावात त्याने १६ चौकार आणि १५ षटकार लगावत आपली आक्रमक शैली दाखवून दिली होती.
वैभवसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरले आहे. या वर्षाची सुरुवात त्याने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून केली. अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक करत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम त्याने प्रस्थापित केला. आयपीएल २०२५ मधील ७ सामन्यांत वैभवने एकूण २५२ धावा केल्या.
याशिवाय वैभव सूर्यवंशीने नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतही शतक झळकावले आहे. युवक एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो आधीच शतकवीर ठरलेला आहे.
दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शौर्य, कला व संस्कृती, पर्यावरण, नवोपक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक सेवा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना या दिवशी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०२२ रोजी श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुत्रांच्या – साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग – यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.







