‘उडणपरी’ पी. टी. उषांची प्रेरणादायी भरारी!

‘उडणपरी’ पी. टी. उषांची प्रेरणादायी भरारी!

भारतीय अॅथलेटिक्सला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्गज धावपटू पी. टी. उषा यांचा २७ जून रोजी वाढदिवस आहे. ‘पय्योली एक्सप्रेस’, ‘भारताची उडणपरी’, ‘गोल्डन गर्ल’ अशा अनेक बिरुदांनी गौरविल्या गेलेल्या उषा यांनी आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय क्रीडाक्षेत्रात अजरामर स्थान मिळवले. अवघ्या नऊव्या वर्षी शाळेतील वरिष्ठ विजेत्या धावपटूला पराभूत करत सुरू झालेला त्यांचा प्रवास आशियाई क्रीडा स्पर्धेतील ११ पदकांपर्यंत जाऊन पोहोचला.

२७ जून १९६४ रोजी केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील पय्योली गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या उषा यांच्याकडे लहानपणी धावण्यासाठी बूट खरेदी करण्याइतकेही पैसे नव्हते. मात्र धावण्याची आवड आणि जिद्द यामुळे त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात केली.

शालेय जीवनातच त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रतिभेची दखल घेत केरळ सरकारने त्यांना २५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्या काळात ही रक्कम त्यांच्यासाठी मोठा आधार ठरली. पुढे विशेष क्रीडा शाळेत प्रवेश घेत त्यांनी प्रशिक्षक ओ. एम. नांबियार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव सुरू केला.

१९७६ मधील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर त्यांचे करिअर वेगाने उंचावले. १९८० मध्ये कराची येथे झालेल्या पाकिस्तान ओपन नॅशनल मीटमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार पदार्पण केले.

पी. टी. उषा यांनी १९८०, १९८४ आणि १९८८ अशा तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला धावपटू ठरल्या. पदक अवघ्या क्षणांच्या फरकाने हुकले असले तरी त्यांच्या कामगिरीने भारतीय अॅथलेटिक्सचा इतिहास बदलला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी एकूण ११ पदके, त्यापैकी ४ सुवर्णपदके जिंकली. याशिवाय आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल २३ पदकांची कमाई करत त्यांनी विक्रमी कामगिरी केली.

वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी अर्जुन पुरस्कार, तर १९८५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अद्वितीय वेगामुळे त्यांना ‘पय्योली एक्सप्रेस’, ‘भारताची उडणपरी’, ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘क्वीन ऑफ ट्रॅक अँड फील्ड’ अशी बिरुदे मिळाली.

२०२२ मध्ये त्यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आजही त्या भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी प्रेरणास्थान असून नव्या पिढीतील खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.

Exit mobile version