भारतीय संघ शनिवारी यूएसएविरुद्धच्या सामन्याने टी20 वर्ल्ड कप २०२६ मधील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.
स्पिन जोडी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह संघाचे फील्डिंग कोच दिलीप हेही मंदिरात उपस्थित होते. मंदिर प्रशासनाकडून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी गुरुवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.
टी20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताचा समावेश ‘ग्रुप-ए’ मध्ये करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड आणि यूएसए यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला यूएसएविरुद्ध होणार असून १२ फेब्रुवारीला नामिबियाशी लढत होईल. १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे, ज्याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारीला नेदरलँडविरुद्ध सामना खेळला जाईल.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे ध्येय इतिहास रचण्याचे आहे. आयसीसी मेंस टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद यशस्वीपणे राखणारा पहिला संघ आणि घरच्या मैदानावर ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनण्याचा संघाचा निर्धार आहे.
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत खेळलेल्या ५६ टी20 सामन्यांपैकी तब्बल ४८ सामने भारताने जिंकले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने ४-१ असा दणदणीत विजय मिळवला.
याआधी १२ जून २०२४ रोजी न्यूयॉर्क येथे भारत आणि यूएसए यांच्यात टी20 वर्ल्ड कप सामना झाला होता. त्या वेळी भारताने यूएसएला ११०/८ धावांवर रोखत १८.२ षटकांत ७ विकेट राखून विजय मिळवला होता. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या होत्या, तर शिवम दुबेने नाबाद ३१ धावांची खेळी साकारली होती.
आता पुन्हा एकदा बाप्पाच्या आशीर्वादाने टीम इंडिया मैदानात उतरणार असून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.







