पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने ६ व ७ मेच्या रात्री अचूक आणि संयमी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत ९ प्रमुख दहशतवादी केंद्रांवर यशस्वी हल्ला केला. या धाडसी कारवाईनंतर देशभरातून लष्कराच्या पराक्रमाचे कौतुक होत आहे. भारतीय क्रीडाविश्वातील अनेक दिग्गजांनीदेखील या ऑपरेशनचे खुले समर्थन करत, भारतीय सेनेला सलाम केला आहे.
बॉक्सर गौरव बिधूडी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “जेव्हा आपण घरात झोपलो होतो, तेव्हा आपली सेना ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडत होती. हे केवळ बदला नाही, तर न्याय आहे. देशाच्या नेतृत्वावर आणि सेनेवर आता सगळा देश गर्व करत आहे.“
ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, “माझ्या शहीद भावाचा बदला घेतला गेला, यामुळे मला समाधान मिळालं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे. ही कृती राजकारण नव्हे, ही जबाबदारी आहे.“
बॉक्सर विजेंदर सिंग यांनी “भारत माता की जय” असे ट्विट करत भावना व्यक्त केल्या, तर सायना नेहवाल आणि सुरेश रैना यांनी सोशल मीडियावर “जय हिंद” लिहून लष्करास सलामी दिली.
संरक्षण मंत्रालयानुसार, या कारवाईपूर्वी सखोल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली होती. या अभियानात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, आणि विशेष म्हणजे कोणत्याही सामान्य नागरिकास किंवा पाकिस्तानी लष्कराच्या मालमत्तेस हानी पोहोचवली नाही.
ही कारवाई भारताच्या स्पष्ट, परिपक्व आणि ठोस दहशतवादविरोधी धोरणाचे प्रतीक मानली जात आहे.