कोरोना संकटानंतर जगाचे अर्थकारण बदलते आहे. एकेकाळी जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनबाबत जागतिक समुहाच्या मनात निर्माण झालेल्या संशयाच्या धुक्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला असून आधीपासून येथे काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवण्याची रणनीती बनवली आहे. ‘बाटा’ हा ब्रँड यात अग्रेसर असून लवकरच भारत बाटाच्या जागतिक निर्यातीचे मुख्य केंद्र बनणार असल्याचे कंपनीच्या धुरीणांनी स्पष्ट केले आहे.
स्वित्झरलॅंड स्थित, आघाडीची पादत्राणे उत्पादक कंपनी ‘बाटा’चे नवनियुक्त ग्लोबल सीईओ संदीप कटारिया यांनी बिझनेस लाईन या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, लवकरच बाटा भारताला जागतिक पुरवठ्याचे प्रमुख केंद्र बनवु इच्छितात.
बाटा परिवाराच्या मालकीच्या या कंपनीचे ग्लोबल सीईओ म्हणून संदीप कटारिया यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या सर्वाोच्च पदावर नियुक्ती झालेले ते पहिले भारतीय आहेत. यापूर्वी ते कंपनीचा भारतातील कारभार पाहात होते. एकूण ७० देशांत वर्षाला १८० दशलक्ष पादत्राणे विकणारी बाटा कंपनी भारताला जगातील पुरवठ्याचा प्रमुख बनवु इच्छित असल्याचे संदीप यांनी बिझनेस लाईनशी बोलताना सांगितले. “सध्या भारतातून भारतातून मोठ्या प्रमाणात बाटामार्फत निर्यात केली जात आहे. परंतु यात कैक पट वाढ करण्याचे कंपनीचे धोरण आहे. बाटा मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवून भारताला जागतिक पुरवठ्याचे मुख्य केंद्र बनवू इच्छिते.” असे कटारीयांनी स्पष्ट केले. याचबरोबर त्यांनी एकंदरीतच बाजारातील बदलते प्रवाह, ग्राहकांचा बदलता कल आणि बाटा इंडियाच्या भविष्यकालीन योजनांबद्दल देखील सांगितले.