दिल्लीत नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. ‘वंचित बहुजन आघाडी’ने येत्या २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे.
दिल्लीत जंतर-मंतर आणि संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन, आंबेडकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
बीडमधील ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड
पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही
सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका मांडताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, “काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुष हल्ला आणि लाठीचार्ज करण्यात आला. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा.”
