28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषकम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

संजय राऊत यांचे राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान

Google News Follow

Related

संजय राऊत यांनी कोवीडच्या दरम्यान राज्यात रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर आता टीका होत आहे. मेडिकल असोसिएशननेही राऊत यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले. संजय राऊतांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले. राऊतांच्या वक्तव्याचा राज्यातील डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी निषेध केलाय. कोरोना काळात डॉक्टर्स आणि नर्स देवदूत ठरले. त्यांनी स्वतःचा जीव, कुटुंबाची पर्वा न करता अनेकांना जीवनदान दिले. पण याच डॉक्टरांबाबत बोलताना संजय राऊत यांनी अपशब्द वापरले, त्यांचा अपमान केला.

कोरोना काळात रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. चोवीस चोवीस तास काम केले. रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टर मृत्युमुखी पडले. त्यांच्या सेवेला सलाम करायचे सोडून त्यांना बदनाम करण्याचे कृत्य संजय राऊतांनी केले. संजय राऊत ज्या वेळेस डॉक्टर आणि नर्स यांनी जबाबदारीतून पळ काढला असे विधान करताहेत. मग रुग्णांवर उपचार केले कुणी? तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठोस निर्णय घेतले म्हणून कोरोनावर आपण विजय मिळवू शकलो नाहीतर मिठी नदीत प्रेतं तरंगताना दिसली असती असे विधान संजय राऊत करतात. तेव्हा ते डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफचा अपमानच करतात. या कोरोनाच्या काळात हे सगळे देवदूत रात्रंदिवस मेहनत घेत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे घरातून बाहेरही पडत नव्हते. त्यामुळे घरात बसून राज्याचा कारभार हाकणारा मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका केली जाऊ लागली होती. त्याच कोरोनाच्या काळात संजय राऊत यांचे एक विधान चांगलेच चर्चेत होते. त्यावरून राऊत यांची यथेच्छ टिंगलही उडविली गेली.

डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या WHO वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच करोना वाढलाय,’ असं वक्तव्य राऊत यांनी केले होते.

स्वतः राऊत हे कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. राऊत कधी हॉस्पिटलमध्ये गेलेत, रुग्णांना मदत करत आहेत असे पाहायला मिळाले नाही. असे अनेक समाजसेवक होते, ते रुग्णांना प्रत्यक्ष मदत करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही रस्त्यावर उतरून लोकांना मदतीचा हात दिला. उद्धव ठाकरेंनी मात्र घरात बसून वाफ घेण्याचे सल्ले दिले. जबाबदारी कुटुंबावरच ढकलली. त्या काळात दुर्दैवाने कोरोना मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मग त्याला कारणीभूत कोण होते? उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे हे झाले असे म्हणायचे का?. असा कोणता निर्णय घेतला की महाराष्ट्र मृतांच्या संख्येमध्ये नंबर वन झाला ते तरी सांगा. घरातूनच तत्कालिन मुख्यमंत्री बाहेरच पडले नाहीत. मग निर्णय़ घेतले कधी.

संजय राऊत म्हणताहेत की आपल्या जबाबदारीपासून डॉक्टर, नर्सेस पळून गेले होते. मग काय डॉक्टरांचे काम संजय राऊत करत होते का, असा सवाल विचारला जातोय.

त्याउलट तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. देवेंद्र फडणवीस यांना या काळात दोनवेळा कोरोनाही झाला. कोरोना झाल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांनी सरकारी रुग्णालयावर, तेथील डॉक्टरांवर विश्वास ठेवला. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोरोना झाला, त्यावेळेस त्यांनी खासगी रुग्णालया धाव घेतली. सरकारी रुग्णालयावर विश्वास ठेवला नाही. त्यांच्यावर झालेल्या उपचाराची भरमसाठ बिलं सरकारी तिजोरीवर लादली गेली. याचा अर्थ काय होतो, की तुमच्याच तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निर्णय़ावर तुमच्या नेत्यांना विश्वास नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी थाळी वाजवा, मेणबत्या लावा असे नागरिकांना जाहीर आवाहन केले. त्यानंतरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करताना दिसले. त्या आवाहनाची खिल्ली उडविली गेली.  पण जनतेने मोदींच्या या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. डॉक्टर, नर्सेस, पोलिस यांना प्रोत्साहन देण्यासाठी जनतेने आपल्या परीने थाळ्या, टाळ्या वाजवून आम्हीही तुमच्या सोबत आहोत, हे दाखवून दिले. ते महाविकास आघाडीला करता आले नाही. कोरोनाचा विळखा सोडवून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावरही टीका केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना थाळ्या वाजवून, दिवे लावून रुग्ण बरे होणार नाहीत हे माहित होते. रुग्ण बरे होतात ते डॉक्टरांच्या कृपेने हे मोदी जाणून होते. परंतु डॉक्टरही ही माणूस असतो. हे बहुतेक महाविकास आघाडीचे नेते विसरले असावेत. मोदींनी आवाहन केले आहे ना, मग आपण त्याला विरोध करायला हवा, या भावनेतून त्यांच्या आवाहनाला महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला पण ती कृती जनतेच्या, कोरोनायोद्ध्यांच्या विरोधात जाणारी होती.

त्यावेळी कोरोना महामारीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे हॉस्पिटलला जाता येत नव्हते. परंतु माणुसकी म्हणून त्यांना धैर्य देणे गरजेचे होते. हे जाणूनच मोदींनी थाळी वाजवून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते, त्यांच्या कामाला सलाम केले होते. अख्खा देश त्यांच्या पाठी उभा राहिला. परंतु हेदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यात खुपले होते. संजय राऊत यांनी केलेले हे ताजे विधान त्याच बेजबाबदारपणातून केलेले आहे.

संजय राऊत यांनी तर त्यापलीकडे जात म्हटले की, उद्धव ठाकरे कोरोना काळात मुख्यमंत्री नसते तर उत्तर प्रदेशात गंगेच्या पात्रात जशी प्रेते दिसली तशी मिठी नदीत प्रेते वाहताना दिसली असती. राजकारणासाठी आपण कोणत्या थराला जातो आहोत, याचे हे उदाहरण आहे. गंगा नदीत मृतदेह सोडणे किंवा तिथल्या किनाऱ्यावर त्यांचे दफन करणे ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे पण त्याचाही उपयोग घाणेरडे राजकारण करण्यासाठी महाविकास आघाडीने केला. ते राजकारणाचे खूळ अजूनही राऊत यांच्या डोक्यात आहे. आपल्या नेत्याच्या लांगुलचालनासाठी डॉक्टर, नर्सेस अशा कोरोनायोद्ध्यांच्या कार्यालाही दुय्यम समजण्याचे पाप त्यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा