जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटकांसह २६ जणांचा मृत्यू झाला होता. या २५ पर्यटकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर दहशतवाद्यांनी हिंदू आहात का असे विचारून गोळ्या मारल्या होत्या. या भ्याड हल्ल्याचा बदला भारताने घ्यावा अशा जनभावना लोकांमध्ये होत्या. पीडित कुटुंबियांनाही मोदी सरकारकडून आशा होत्या. पंतप्रधान मोदींनीही दहशतवादी आणि या हल्ल्यांचे सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा वारंवार दिला होता. अखेर ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उध्वस्त केले. यानंतर बदला पूर्ण झाला अशा भावना लोकांमध्ये असून पीडितांच्या कुटुंबीयांनीही लष्कर आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीमेनंतर पहलगाम हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. जगदाळे यांच्या पत्नीने म्हटलं की, “सिंदूर ऑपरेशनमधून हल्ल्यातील सर्वांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव दिल्याबद्दल आभारी आहे. नरेंद्र मोदींनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमच्या समोर आमचं कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसलं होतं. आज पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला. त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं. खात्री होती की, थोड वेळ घेतील पण ते नक्कीच प्रत्युत्तर देतील.” तर जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे. १५ दिवसात मिशन पूर्ण केलं यासाठी सरकारचे आभार.”
पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. “आम्ही सर्वजण अशा कारवाईची वाट पाहत होतो आणि आम्हाला केंद्र सरकारकडून ही अपेक्षा होती. कारवाईचे नाव ‘सिंदूर’ असून मला वाटते की माझ्या आईसारख्या महिलांचा आदर करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे.” कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनीही प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, “सैन्यदलाने केलेली कारवाई योग्य असून त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे.”
भारताच्या कारवाईवर हुतात्मा विनय नरवाल यांच्या आई आशा नरवाल यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घेतला ही सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. आमचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे. मी सैन्याच्या जवानांना हेच सांगेन की, तुम्ही पुढे जात राहा आणि असाच बदला घेत राहा. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी त्यांना असेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. ऑपरेशन सिंदूर केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली मिळाली आहे. त्यांना न्याय मिळाला आहे,” असे आशा नरवाल यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद
भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू, पाकव्याप्त काश्मिरातील ९ ठिकाणी भारतीय लष्कराने केला हल्ला
भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्य दलाचे आभार मानले आहेत. “माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला यासाठी मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देते. मी फक्त त्यांना धन्यवाद करेन. त्यांना काहीही बोलण्यासाठी किंवा न बोलण्यासाठी मी फार लहान आहे. आमच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर विश्वास होता, त्यांनी त्याच प्रकारे प्रत्युत्तर देत आमचा विश्वास कायम ठेवला. ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे,” अशा भावना शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने व्यक्त केल्या आहेत.