भारताची जनता कदाचित विसरली असेल. तीन वर्षापूर्वीची घटना आहे. अंबालाच्या हवाई तळावरून एक ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र चुकून सुटले. ते सुसाट पाकिस्तानच्या सीमेत शिरले. १२४ किमीचा सुस्साट प्रवास करत ते
पंजाब प्रांतातील मिया चन्नू या भागात जाऊन आदळले. सुमारे तीन मिनिटे ४४ सेकंद ते पाकिस्तानच्या हद्दीत होते. पाकिस्तानच्या सुदैवाने या क्षेपणास्त्रामुळे कोणतीही मनुष्य हानी झाली नाही. दोन दिवसांनंतर भारतीय संरक्षण दलाने ही
तांत्रिक चूक असल्याचे मान्य केले. पाकिस्तानवर युद्धाचे ढग दाटले असताना पाकिस्तानच्या नॅशनल एसेंम्बलीत विरोधी पक्ष नेते, पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे उमर अयूब यांना या घटनेची आठवण झाली. भारताविरुद्ध मांडलेल्या
निंदा प्रस्तावावर बोलताना अयूबना ज्यांनी ज्यांनी ऐकले असेल त्यांना निश्चितपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आठवण झाली असणार.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. पहीली काडी पाकिस्तानने केली. त्याची फळे आता पाकिस्तानला भोगायची आहेत. कोणत्याही क्षणी भारताचे सेनादल आपल्यावर कोसळेल, अशी
भीती पाकिस्तानला सतावते आहे. लष्कर, राजकीय नेते, जनता कोणीही या भीतीपासून मुक्त नाही. सर्वांना विनाश दिसतो आहे. भारतासमोर आठवडाभर उभे राहता येईल इतपत आर्थिक, लष्करी बळही पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे ही
भीती अधिक गडद झालेली आहे. कोणत्याही देशासमोर जेव्हा असा काही प्रसंग उभा ठाकतो तेव्हा देश मतभेद विसरून एकत्र येणे, वयम् पंचाधिका शतम्… अशी भूमिका घेणे अपेक्षित असते. पाकिस्तानने तसेच काही करण्याचा प्रयत्न
केला. परंतु तो पूर्णपणे फसला. अंगलट आला. संसदेत देशाचे प्रतिनिधीत्व असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या भावना इथे व्यक्त होत असतात.
भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या नॅशनल एसेंम्बलीमध्ये जेव्हा भारताच्या विरुद्ध निंदा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा सगळे सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी तिथल्या सरकारची हीच अपेक्षा होती. कारण यापूर्वी तसे घडले आहे. चूक पाकिस्तानची असली तरी युद्धाच्या परीस्थितीत पाकिस्तानच्या जनतेने तात्कालिक का होईना, पण एकोपा दाखवला. तशी परीस्थिती यावेळी दिसत नाही. देशाची जनता लष्कर आणि कठपुतळी सरकारच्या विरोधात उघडपणे बोलते आहे. त्यांचे वाभाडे काढते आहे. नॅशनल एसेंम्ब्लीत जी काही चर्चा झाली त्यातून यावर शिक्कामोर्तबच झाले. खोलवर दडलेले दुभंग उफाळून आले. देश किती नागडा आहे, अंतर्कलहाने किती बेजार आहे, हे पाकिस्तानातील लोकप्रतिनिधींनीच ओरडून ओरडून सांगितले. विरोधी पक्ष नेते आणि पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते उमर अयूब यात आघाडीवर होते. हा खून्नस आपण समजू शकतो.
जनतेचा पाठींबा असलेल्या नेत्याला, म्हणजे इम्रान खान याला लष्करशहांनी तुरुंगात टाकले आहे. लष्कराचे प्यादे असलेला बिनकण्याचा शहाबाज शरीफ देशाचे नेतृत्व करतोय. पाकिस्तान मुस्लीम लीग, नवाझ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या
या आघाडी सरकारवर उमर अयूब यांनी, जोरदार फटकारे ओढले. भाषणाची सुरूवातच देशाला आज मजबूत नेतृत्वाची गरज आहे, या शब्दात केली. दुसऱ्या महायुद्धात नेव्हील चेंबर्लेन यांच्या नेतृत्वामुळे ब्रिटनचे कसे नुकसान झाले.
कमजोर नेतृत्वामुळे तिच परीस्थिती पाकिस्तानवर ओढवली आहे, असे सांगत त्यांनी शाहबाज शरीफ यांच्यावर तीर चालवले. आज देशाचे नेतृत्व इम्रान खान यांच्याकडे असते तर परिस्थिती वेगळी असती, अशी जळजळीत टीका त्यांनी
केली. राहुल गांधी जसे देशविदेशात भाजपाला अडचणीत आणण्याच्या नादात देशावर चिखलफेक करतात, त्याची आठवण अय़ूब यांचे भाषण ऐकून झाली. योगायोग म्हणजे दोघेही आपापल्या देशात विरोधी पक्षनेते आहेत. अर्थात हेही काही खरे नाही, कारण इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात भारताने बालाकोट हवाई हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हग्या दम दिल्यानंतर अभिनंदन वर्धमान याला बाइज्जत भारताच्या स्वाधीन केले होते. परंतु सत्ताधारी पक्ष सध्या प्रचंड अचडणीत असल्यामुळे ते अयूब यांना उत्तर देण्याच्या फार भानगडीत पडले नाहीत.
हे ही वाचा:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिराला देणार भेट!
नेतृत्वाचं ओझं, कोहलीचं मोजणं!
पावसाने दिल्लीच्या प्लेऑफ स्वप्नांवर पाणी फिरवलं!
अयूब यांचे भाषण इतके जहाल होते की ते पाकिस्तानने सेन्सॉर केले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते अब्दुल कादीर म्हणाले की, अयूब यांच्या भाषणावर भारतात निश्चितपणे टाळ्यांचा कडकडाट झाला असेल. कादीर म्हणाले ते अगदी बरोबर होते. कारण अयूब यांनी पाकिस्तानची दुरवस्था सांगताना हात अजिबातच आखडता घेतला नाही. पाकिस्तानकडे फक्त १० अब्ज डॉलर्सचे चलन शिल्लक आहे, आयएमएफने कर्ज दिले नाही तर आपल्या जनतेला दोन वेळचे जेवणही मिळणार नाही, भारताच्या तयारीसमोर आपण अगदीच कमजोर आहोत. बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध, काश्मीरच्या जनतेत प्रचंड असंतोष आहे. सैन्याचे कसे अत्याचार सुरू आहेत, हे सगळे साग्रसंगीत सांगितले. आता एवढे सांगितल्यानंतर आम्ही भारताविरुद्ध लढायला तयार आहोत, असे सांगण्यात काय अर्थ आहे, असा अब्दुल कादीर यांचा सवाल होता. तो योग्यही होता.
अयूब यांनी ब्रह्मोसबाबत धास्ती व्यक्त केली, ती काही अनाठायी नाही. भारताचे ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. तासाला ३७०० किमीचे अंतर कापते. क्षेपणास्त्राचा भारताने जाहीर केलेला पल्ला ४५० ते ५०० किमी आहे. तो त्यापेक्षा बराच जास्त असावा, असा इतर देशांचा होरा आहे. पाकिस्तानला ब्रह्मोसची धास्ती अशासाठी आहे की, सुमारे पावणे चार मिनिटे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत होते, तरीही पाकिस्तानच्या रडार यंत्रणांना त्याचा पत्ताच लागला नाही. पाकिस्तान चिनी बनावटीची वायएलसी रडार यंत्रणा वापरतो. काही ठिकाणी देशी बनावटीची रडार यंत्रणाही वापरली जाते. ती किती तकलादू आहेत, हे मिया चन्नू घटनेच्या निमित्ताने उघड झाले. पाकिस्तानची परिस्थिती इतकी डबघाईला आली आहे, की थापांवरही लोकांचा सहज विश्वास बसतो. तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) बंडखोरांनी खैबर पख्तूनख्वा येथील पाकिस्तानी हवाई दलाचे एफ१६ हे विमान पळवून नेले ही बातमी DAWN या वृत्तपत्राच्या हवाल्याने चालवण्यात आली होती. नंतर वृत्तपत्राकडून खुलासा आला की अशी कोणतीही बातमी आम्ही दिलेली नाही.
सेण्ट्रल जेल ऑफ रावलपिंडीमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे नेते इम्रान खान यांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर बलात्कार झाल्याची बातमी पाकिस्तानचे तमाम यूट्यबब चॅनल चालवतायत. काही दिवसांपूर्वी इम्रान यांच्या तीन बहिणी जेव्हा त्यांना भेटायला तुरुंगात गेल्या होत्या, तेव्हा त्यांना भेट नाकारली. त्यांच्याशी अभद्र व्यवहार करण्यात आला. पीटीआयचे नेते शहाबाज गिल यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली होती. इम्रान खान यांच्यावर बलात्कार झाल्याबाबत पीटीआयचे नेते बोलत नसले तरी ज्या प्रकारे इम्रान यांना वागणूक दिली जात आहे, त्याबाबत मात्र तिथे
मोठी खदखद आहे. तीच खदखद उमर अयूब यांनी पाकिस्तानच्या नॅशनल एसेम्बलीत व्यक्त केली. ही खदखद एकांडी नाही. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रियांची लाट आलेली आहे. खैबर पख्तुनख्वामधील एका मशीदीचा मौलाना मोहमद रंगीलाने भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही सगळे पश्तू भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहू असे जाहीरपणे सांगितले आहे. मोदी पाकिस्तानला दणका देतील, याबाबत भारतात बऱ्याच जणांना शंका आहे. पाकिस्तानला मात्र याबाबत पूर्ण खात्री पटलेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)