भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१७ जुलै) हरियाणातील जींद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. जींद ते सोनीपत या मार्गावर धावणारी ही ट्रेन भारताच्या हरित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन्सपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी स्थानकावर उपस्थित नागरिक आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिवादन स्वीकारले. दुसऱ्या फलाटावर मोठ्या संख्येने नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी केली होती.
पहिल्या प्रवासासाठी ट्रेनमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटला. पर्यावरणपूरक ‘ग्रीन ट्रान्सपोर्ट’चा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण होते.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या या ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार असून भविष्यात भारतीय रेल्वेला हरित ऊर्जेकडे नेण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेगाड्यांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळणार आहे.
हे ही वाचा:
SIR मोहिमेदरम्यान महिला बीएलओशी गैरवर्तन; चार आरोपी गजाआड
पश्चिम बंगालमध्ये ट्रेनची कारला धडक; दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू
चीनने २२ कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरला!
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी कोसळला रॉड, कार्यकर्ता मृत्युमुखी
हायड्रोजन ट्रेनच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी यांनी जींद येथील एकलव्य स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात सुमारे १४,७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. यामध्ये ९,६८० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या १५७.९२ किलोमीटर लांबीच्या दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाच्या (पॅकेज १ ते ५) टप्प्याचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. या महामार्गामुळे दिल्ली- कटरा प्रवासाचा कालावधी १४ तासांवरून सुमारे ६ तासांपर्यंत, तर दिल्ली-अमृतसर प्रवास ८ तासांवरून ४ तासांपर्यंत कमी होणार आहे. याशिवाय अंबाला-काला आंब चारपदरी महामार्गाचे उद्घाटन, जींद-गोहाना ग्रीनफिल्ड महामार्गाचे लोकार्पण तसेच हांसी-बरवाला ब्राऊनफिल्ड महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.







