भारत पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप लढत एक दिवस आधीच खेळविण्याचा विचार केला जात आहे. १५ ऑक्टोबरला ही लढत अहमदाबाद येथे होणार आहे पण त्याच दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे या सणाच्या अनुषंगाने एक दिवस आधीच ही लढत खेळविली जाण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांनी वर्ल्डकपचा जो कार्यक्रम जाहीर केला त्यात १५ ऑक्टोबर ही तारीख या दोन देशातील बहुचर्चित लढतीसाठी निश्चित करण्यात आली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार आहे. या लढतीची घोषणा झाल्यानंतर अहमदाबादमधील हॉटेल्स आणि विमानांच्या तिकिटांचे दर तात्काळ वाढले. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. आता एक दिवस आधी जर ही तारीख घेण्यात आली तर त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
हे ही वाचा:
मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…
“एलओसी ओलांडू शकतो… ओलांडणार; राजनाथ सिंह यांचा इशारा
‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षतेसाठी काँग्रेस दावा करण्याची शक्यता
…म्हणून एका वर्षात पाच कोटींहून अधिक मनरेगा जॉब कार्डे रद्द
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ऑक्टोबर १५ला नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे सगळीकडे सण साजरा केला जात असेल त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ही तारीख एक दिवस आधी घेण्याची सूचना केली. कारण सण असल्यामुळे त्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताची गरज असेल. त्यात सामन्याचे आयोजन केले गेले तर पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येऊ शकतो, असे सांगण्यात आले.
आता आयसीसी आणि बीसीसीआय यांना पुन्हा एकदा नव्या तारखेबाबत चर्चा करावी लागेल. पण हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्टेडियमवर खेळविला जाणार नाही. त्यामुळे आता चाहत्यांना या नव्या तारखेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये हा सामना होणार असला तरी लोकांनी आतापासूनच हॉटेल बुकिंग, विमान तिकिटे यांचा विचार केलेला आहे. आता फक्त नवी तारीख जाहीर झाली तर त्यानुसार ते बुकींग बदलावे लागणार आहे.
भारताची या वर्ल्डकपमधील सलामीची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असून ९ ऑक्टोबरला हा सामना चेन्नईत होईल. तर पाकिस्तानच्या पहिल्या दोन लढती हैदराबाद येथे होतील. त्या ६ व १२ ऑक्टोबरला होतील. एक दिवस सामना आधी खेळविला गेला तर पाकिस्तानलाही आपल्या तयारीत बदल करावा लागेल. आता या वर्ल्डकप तयारीसंदर्भात भारतीय क्रिकेट बोर्ड विविध राज्य संघटनांशी चर्चा करणार आहे. २७ जुलैला ही बैठक होईल. त्यावेळी भारत पाकिस्तान सामन्याच्या नव्या तारखेची चर्चाही होऊ शकेल.