आयएनएसव्ही कौंडिण्य ची निर्मिती ही प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम म्हणता येईल. भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय, इतिहासतज्ज्ञ, अभियंते आणि पारंपरिक जहाजनिर्माते यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प साकार केला आहे. अजंठ्यातील दोन-आयामी चित्रांवरून जहाजाचा त्रिमितीय आकार ठरवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी आधुनिक जलगतिक चाचण्या, संरचनात्मक विश्लेषण आणि सुरक्षिततेची आधुनिक मापदंड वापरण्यात आली, आणि त्यातही ऐतिहासिक प्रामाणिकपणा जपण्यात आला. हे जहाज प्राचीन गुजरात–अरब व्यापारमार्ग पुन्हा समुद्रातून पार करत आहे, ही मोहीम अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे भारताची प्राचीन जहाजनिर्मिती परंपरा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर समजून घेता येते. म्हणूनच आयएनएसव्ही कौंडिण्य हे जहाज भूतकाळाचा गौरव करताना भविष्यासाठी आत्मविश्वास देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.
‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ हा केवळ भारतीय नौदलात दाखल झालेला एक नवीन नौका-प्रकल्प नाही, तर भारताच्या प्राचीन सागरी परंपरेचा जिवंत आणि चालता-बोलता दस्तऐवज आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडातील लोकांनी समुद्राला केवळ अडथळा न मानता संधी म्हणून पाहिले होते, याचा हा ठोस पुरावा आहे. या जहाजाविषयीची विशेष उल्लेखनीय बाब अशी की, अजंठा लेण्यांमधील पाचव्या शतकातील भित्तिचित्रांमध्ये दिसणाऱ्या जहाजांच्या रचनांचा तपशीलवार अभ्यास करुन हे जहाज तयार करण्यात आले आहे.
त्या काळात भारताचा आग्नेय आशिया, अरबी द्वीपकल्प आणि आफ्रिकेशी सागरी व्यापार होता, हे अनेक ऐतिहासिक संदर्भांतून स्पष्ट होते. ‘कौंडिण्य’ या प्राचीन भारतीय नाविकेवर आधारित आयएनएसव्ही कौंडिण्य हे जहाज, भारतातून समुद्रमार्गे बाहेर पडलेल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी संपर्कांची आठवण करून देते. त्यामुळे हे जहाज केवळ भूतकाळाचे स्मारक नसून, भारताच्या सागरी आत्मविश्वासाचे प्रतीक ठरते.
हे ही वाचा:
दहशतवादी कारवायांत सामील असणाऱ्यांना दिलासा नाहीच
अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद
जवाहरलाल नेहरू यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणास नकार दिला होता
पचनापासून महिलांच्या आरोग्यापर्यंत…
आयएनएसव्ही कौंडिण्य चे खरे वैशिष्ट्य त्याच्या बांधणीच्या पद्धतीत आहे. आधुनिक लोखंडी किंवा स्टीलच्या जहाजांप्रमाणे खिळे किंवा वेल्डिंग न करता, हे जहाज पूर्णपणे पारंपरिक ‘स्टिच्ड शिप’ म्हणजेच शिवण पद्धतीने बांधलेले आहे. लाकडी फळ्या नारळाच्या दोऱ्यांनी, नैसर्गिक तंतूं राळेच्या सहाय्याने एकमेकांना जोडण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे जहाजाचा घड लवचिक राहतो आणि समुद्रातील लाटांचा ताण सहजपणे सहन करू शकतो. प्राचीन काळातील दीर्घ समुद्रप्रवासांसाठी ही लवचिकता अत्यंत उपयुक्त होती. या तंत्रामुळे दुरुस्तीही तुलनेने सोपी होती, कारण संपूर्ण रचना मोडण्याची गरज पडत नसे. आजच्या काळात ही पद्धत पुन्हा वापरात आणल्यामुळे केरळसह भारताच्या किनारी भागांतील पारंपरिक सुतार आणि कारागिरांच्या पिढ्यानपिढ्यांच्या ज्ञानाला नव्याने प्रतिष्ठा मिळाली आहे.







