शैक्षणिक आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासह वेगवेगळे तंत्रज्ञान, निरनिराळे खेळ, योगा, व्यायाम आदींवरही भर देणे गरजेचे आहे. शाळा व्यवस्थापनानेही मुलांच्या बौद्धीक विकासासह त्यांच्या शारीरिक विकासाकडेही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी मुलांना सकस आणि पौष्टीक आहार मिळतो की नाही, याबाबतही विचार करायला हवा. कारण मुले सक्षम तर देश सक्षम होईल, अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुलांच्या आयुष्यातील आहाराचे महत्त्व विषद केले. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व इंडियन पेडट्रिशिअन असोसिएशन यांच्या सहकार्यातून ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते.
आज भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात हे शिबिर पार पडले. यावेळी व्यासपीठावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरच्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, इंडियन अकॅडमी ऑफ पेडट्रिशिअनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजावडेकर, उप आयुक्त रमाकांत बिरादार, उप आयुक्त संजय कुऱहाडे, आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती दक्षा शहा, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी उपस्थित होते.
हेही वाचा..
देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नीरा नरसिंहपूरच्या श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे
जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!
आठ वर्षांनंतर उलगडला ‘लव्ह जिहाद’चा कारनामा; पती हिंदू नसल्याचा पर्दाफाश
मंत्री केसरकर म्हणाले, आपली शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आहे. तसेच शाळांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचाही योग्य वापर करायला हवा. मुलांचा सर्वांगिण विकास हा शालेय जिवनात होतो. त्यामुळे मुलांना शिक्षणासह, आरोग्य, क्रीडा आदी सुविधा उपलब्ध करून द्या. योग्य वेळी योग्य सुविधा मिळणे हा मुलांना हक्क आहे. तो त्यांना मिळालाच हवा. तसेच माध्यान्ह भोजनात मुले काय खातात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी देखील शिक्षण विभागाकडून अभ्यासू शेफ आणि आहारतज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. लवकरच ही समिती मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरविणार आहे. तसेच शाळांच्या टेरेस गार्डनवर पिकवलेल्या फळभाज्यांचे सलाड मुलांना मध्यान्न भोजनाद्वारे देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुलांना आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर कशी ठेवता येईल तसेच फटाक्यांबाबतही शिक्षकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे, असल्याचे केसरकर म्हणाले.