झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण रस्ता अपघात झाला. ओरसा व्हॅली परिसरात प्रवासी बस खोल दरीत कोसळल्याने ५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बसमध्ये सुमारे ७० ते ८० प्रवासी होते. हे सर्व प्रवासी छत्तीसगड राज्यातून लग्न समारंभासाठी झारखंडकडे प्रवास करत होते. ओरसा व्हॅलीतील तीव्र उतार आणि वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखालच्या खोल दरीत उलटली.
हे ही वाचा:
गाझासाठी शांतता मंडळ, १ अब्ज डॉलर भरा कायमचे सदस्य व्हा!
वादानंतर मार्कर पेन जाणार, बाटलीतील शाई येणार
त्या आरपीएफ महिलेने केली रेल्वे स्थानकावरून १५०० मुलांची सुटका
इंडिगोवर ठोठावला २२ कोटींचा दंड
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी १० हून अधिक रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या. जखमींना तात्काळ लातेहार जिल्हा रुग्णालय तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी रांची येथे हलवण्याची तयारी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार, बस दरीत कोसळल्यानंतर काही वेळ प्रवासी बसखाली अडकल्याची भीती होती. मात्र, बहुतेक प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. घटनास्थळी अजूनही पोलीस आणि प्रशासनाची पथके तैनात आहेत.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण झारखंड राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी सुरू केली असून, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.







