मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांत कावड यात्रेच्या पवित्र प्रसंगी भगवान शिवाच्या भक्तांचे स्वागत करून त्यांच्या श्रद्धेचा सन्मान केला. मेरठमध्ये त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कावडीयांवर पुष्पवृष्टी केली. काही जिल्ह्यांत त्यांनी हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी करत श्रद्धेप्रती आपला आदर व्यक्त केला. मेरठमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगींनी गोंधळ घालणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, जो कोणी कावड यात्रेच्या आड येऊन उपद्रव करेल किंवा या पवित्र यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करेल, त्याला कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, “सावन महिन्याच्या या पवित्र प्रसंगी मी सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन करतो. देशभरातून लाखो शिवभक्त हरिद्वारहून पवित्र गंगाजल घेऊन भगवान शिवाच्या विविध मंदीरांमध्ये जलाभिषेक करतील. बाबा औघडनाथ मंदिर, पुरा महादेव मंदिर, दुग्धेश्वरनाथ मंदिर यांसारख्या पवित्र स्थळांवर श्रद्धाळू आपली श्रद्धा व्यक्त करतील. युवक, महिला, मुले आणि वृद्ध या यात्रेत सहभागी होत सामाजिक समतेचं अनुपम उदाहरण मांडत आहेत.”
हेही वाचा..
आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध एफआयआर
अमेरिकेने मेक्सिकन विमानसेवेवर लादले नवे निर्बंध
नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना मोठे यश
…तर राहुल गांधींना भारताची प्रगती दिसेल
योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, काही असामाजिक घटक या पवित्र यात्रेला कलंकित करण्याचा कट रचत आहेत. सोशल मिडिया आणि इतर माध्यमांतून कावड यात्रेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक कावड संघ आणि शिवभक्ताने अशा उपद्रव करणाऱ्यांची ओळख करून त्यांना उघडं पाडण्याचं काम करावं, तसेच प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि यात्रा पूर्ण झाल्यानंतर उपद्रव करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांचे पोस्टर सार्वजनिक केले जातील. अशांवर कठोर कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, कावड यात्रेच्या यशस्वी आणि सुरक्षित आयोजनासाठी सरकार, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्थांनी व्यापक तयारी केली आहे. श्रद्धाळूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतूक किंवा सुरक्षेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. ठिकठिकाणी पांडाल, स्वागत शिबिरे, पिण्याच्या पाण्याची, प्राथमिक आरोग्यसेवा आणि विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी अपील केलं की, “यात्रेदरम्यान स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी घाण करू नका. ही यात्रा जितकी पवित्र आहे, तितकीच तिची गरिमा कायम ठेवणं आवश्यक आहे.”
यावेळी मुख्यमंत्री योगींनी २०१७ पूर्वीच्या सरकारांवरही टीका केली. “तेव्हा अशा पवित्र यात्रांना प्रोत्साहन मिळायचं नाही, उलट अडथळे निर्माण केले जायचे. आज श्रद्धेला सन्मान देणारी सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताचंही कर्तव्य आहे की ही परंपरा शांततेने आणि गरिमेने पुढे न्यावी. शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की, “जर कुणाला उपद्रव करणाऱ्यांविषयी माहिती मिळाली, तर स्वतः न्याय हातात न घेता प्रशासनाला कळवा. भगवान शिव हे लोककल्याणाचे देव आहेत. त्यांची कृपा सर्वांवर सारखीच असते. त्यामुळे या यात्रेला कोणत्याही प्रकारच्या हिंसा किंवा अव्यवस्थेपासून दूर ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.”







