उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी वाराणसी येथे गंगा नदीने पुन्हा एकदा आपला रौद्र अवतार दाखवला आहे. डोंगराळ भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. याचा सर्वाधिक परिणाम वाराणसीत दिसून येत आहे. गंगेचं पाणी चेतावणी बिंदू (७०.२६ मीटर) ओलांडून आता धोक्याच्या पातळीला (७१.२६ मीटर) जवळ पोहोचलं आहे. केंद्रीय जल आयोगानुसार मंगळवारी सकाळी ८ वाजता गंगेचं पाणी ७०.९८ मीटर इतकं नोंदवलं गेलं असून ते प्रतितास साधारण १ सेंटीमीटर वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील २४ तासांत जलस्तर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील एकूण ८५ घाटांपैकी बहुतांश पूर्णपणे जलमग्न झाले आहेत. अस्सी घाटापासून दशाश्वमेध, मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांपर्यंत सर्वत्र गंगेचं पाणी भरलं आहे. घाटांमधील संपर्क पूर्णपणे तुटल्यामुळे एका घाटावरून दुसऱ्यावर जाणं अशक्य झालं आहे. घाटावर असलेली ‘नमस्कार’ आकृतीतील भव्य प्रतिमाही पाण्याखाली गेली आहे. घाटाचा प्लॅटफॉर्म, पायऱ्या व आसपासचा परिसर सगळा पुराच्या पाण्यात बुडाला आहे. नमो घाटावर खाली जाण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. येथे असलेले सेल्फी पॉईंट व इतर सुविधा बंद आहेत.
हेही वाचा..
ब्रिटनमधला खासदार म्हणतो पाकिस्तानींना व्हिसा देऊ नका!
बांगलादेशी हिल्सा मासा दुर्गा पुजेला का मागवला जातो?
नेपाळ निदर्शने: सरकारच्या कारवाईचा निषेध करत कृषिमंत्र्यांचा राजीनामा
“नेपाळमध्ये असंतोष कायम; सोशल मीडिया सुरु होताच पुन्हा जनआंदोलन पेटलं”
पुराचा फटका केवळ घाटांपुरता मर्यादित नाही. गंगेच्या वाढत्या पातळीमुळे वरुणा नदीतही उलट प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे शहरातील नगवा, संगमपुरी कॉलनी व बस्ती यांसारख्या खालच्या भागांत पाणी घुसलं आहे. सुमारे २४ मोहल्ले व ४४ गावे बाधित झाली आहेत. हजारो लोकांना घरं सोडून स्थलांतर करावं लागलं आहे. बीएचयू जवळच्या नगवा नाल्यातून पाणी भरल्याने रामेश्वर मठ आणि आसपासचे भाग जलमग्न झाले. गंगोत्री विहार कॉलनीतील १२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. आतापर्यंत एकूण १,४१० कुटुंब विस्थापित झाली असून ६,३७६ लोक प्रभावित आहेत. शेतीलाही मोठा फटका बसला असून ६,२४४ शेतकऱ्यांची १,७२१ एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.







