बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या न भूतो न भविष्यती विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. २४३ जागा असलेल्या विधानसभेत नरेंद्र मोदी, नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकत अनेक विक्रम मोडित काढले. २४३ पैकी जवळपास २०२ जागांवर आघाडी घेत एनडीएने जोरदार कामगिरी केली. भाजप जवळजवळ ९५ टक्के स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून त्यांनी आतापर्यंतचे बिहारमधील सर्वात मोठे यश मिळविले आहे. भाजपाने ९१ जागांवर लीड घेतली असून जनता दल युनायटेडने नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ८३ जागी यश मिळविले आहे. तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या महागठबंधनला मात्र अवघ्या ३५ जागांवरच यश मिळू शकले. अर्थात, अद्याप संपूर्ण निकाल आलेले नाहीत. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या बिहारसारख्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रचारशक्ती यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
राजद, काँग्रेस आणि तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महागठबंधनला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वेक्षणे आणि जनमत चाचण्यांमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळत असूनही, विरोधक ३५ जागांच्याही आसपास पोहोचण्यासाठी झगडत होते. एक्झिट पोलमध्ये मात्र एनडीएलाच पसंती दिली गेली असली तरी त्यापेक्षा पुढे जाऊन एनडीएने २००+ जागांवर यश मिळविले. काँग्रेसचा मात्र या निवडणुकीत सुपडा साफ झाला. दोन अंकी जागा २०२०मध्ये जिंकणाऱ्या काँग्रेसला ५ जागांपर्यंतच मजल मारता आली होती. तर २०२०ला ७५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने अवघ्या २५ जागांपर्यंत कशीबशी मजल मारली.
भाजपने १०१ पैकी ९१ हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. या कामगिरीमुळे पक्ष देशातील “नंबर वन राजकीय शक्ती” म्हणून आपले स्थान अधिक दृढ करणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागले होते, त्या धक्क्याचीही भरपाई बिहारची कामगिरी करेल.
दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणामधील सलग विजयी कामगिरीनंतर बिहारचा हा विजय महत्वाचा मानला जात आहे.मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांनी दिलेल्या ठाम समर्थनाचा जद(यू)ला मोठा फायदा झाला. २०२० मध्ये फक्त ४३ जागा मिळवल्यानंतर या वेळी पक्ष ८४ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होता आणि जवळपास १९% मत मिळाली होती.
एलजेपी (आरव्ही), ज्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री चिराग पासवान करत आहेत आणि जे स्वतःला पंतप्रधान मोदींचे “हनुमान” म्हणवतात, त्यांनी २८ उमेदवार रिंगणात असतानाही १९ हून अधिक जागांवर आघाडी घेतली. बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी १२२ जागांची गरज आहे.
हे ही वाचा:
दिल्ली स्फोटकांचे धागेदोरे मिनी पाकिस्तान बनलेल्या ‘नूंह’मध्ये
“बिहार निवडणुकीचा निकाल निराशाजनक; काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज”
निर्वाचन आयोगावर मतदार यादीत गडबडीचे आरोप होत असताना दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एनडीएचा हा विजय महत्त्वपूर्ण ठरला आहे. अनेक जण याकडे पुढील सहा महिन्यांत होणाऱ्या पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांचे संकेत म्हणून पाहत आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांनी हिंदीत “एनडीए बिहारमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या दिशेने” असे एक्सवर लिहिले.
दिल्लीतील भाजप आणि जद(यू) कार्यालयांमध्ये ढोल, फटाके आणि घोषणांनी जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासाजवळ कार्यकर्ते “टायगर अभी जिंदा है” असे पोस्टर हातात घेऊन फोटो काढत होते.
राज्य भाजपाध्यक्ष दिलीप जायसवाल म्हणाले, “नीतीश कुमार यांची प्रतिमा वाघापेक्षाही मोठी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हे ट्रेंड्स निकालातही रूपांतरित होतील.”
अजून कोणत्याही जागेचा अधिकृत निकाल लागलेला नसतानाही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (तारापुर), विजय कुमार सिन्हा (लखीसराय), तसेच मंत्री नितीन नबीन (बांकीपुर) आणि नितीश मिश्रा (झंझारपूर) यांनी भक्कम आघाडी घेतली होती.
भाजपने १०१ जागांवर जवळपास २१ टक्के मते मिळवली होती. विराेधातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणारे राजद २५ जागांवर आघाडीवर होते, ही अत्यंत निराशाजनक कामगिरी होती.
राजदचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपुर या राजदच्या बालेकिल्ल्यातही अडचणीत होते आणि ७५०० पेक्षा अधिक मतांनी मागे होते. भाजपचे सतीश कुमार आघाडीवर होते. शेवटच्या टप्प्यात तेजस्वी यांनी एक हजार मतांची आघाडी घेतली होती.
केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि राज्यसभा सदस्य उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा—या दोन्ही एनडीएच्या लहान भागीदार—पाच आणि चार जागांवर अनुक्रमे आघाडीवर होते. दोन्ही पक्षांनी सहा-सहा जागांवर निवडणूक लढवली होती.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले, “राहुल गांधींनी नेहरूजींच्या जयंतीदिनी काँग्रेसला दिलेली भेट—९५ पराभव! वारसा गमावला, विश्वासार्हता गमावली!” हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने ६ जागांवर आघाडी घेतली होती. पक्षाने ३२ जागांवर निवडणूक लढवली होती.
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीचा जोरदार प्रचार असूनही एकाही जागेवर आघाडी दिसत नव्हती.
सलग दोन निवडणुकांत भाजपने जद(यू)पेक्षा चांगली कामगिरी केल्याने, पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये “स्वतःचा मुख्यमंत्री” या मागणीला बळ मिळू शकते.
महत्त्वाचे म्हणजे, बिहार हे काही मोजक्या राज्यांपैकी एक आहे जिथे भाजप अद्याप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकलेले नाही.
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र या प्रश्नावर अद्याप सावध भूमिका घेतली आहे. दोघेही म्हणतात की “बिहारमध्ये एनडीएचे नेतृत्व नीतीश कुमार करत आहेत.” भाजपला लोकसभेत बहुमत नसल्यामुळे आणि जद(यू) व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षासारख्या सहकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, हे लक्षात घेता ही रणनीती अवलंबली असावी.







