छत्तीसगडच्या लोककलेला जागतिक स्तरावर पोहोचवणारा बुलंद आवाज अखेर कायमचा शांत झाला आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आणि पंडवानी परंपरेच्या महान गायिका डॉ. तीजन बाई यांचे रविवारी रायपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय लोककला, संगीत आणि सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली असून देशभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
महाभारतातील कथा प्रभावी गायन, अभिनय आणि नाट्यमय सादरीकरणातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या पंडवानी या लोककलेला तीजन बाईंनी जागतिक ओळख मिळवून दिली. पारंपरिक पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या कलेत त्यांनी महिलांसाठी नवे दालन उघडले आणि आपल्या दमदार आवाज, अभिनयशैली तसेच विलक्षण अभिव्यक्तीमुळे देश-विदेशातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणामुळे छत्तीसगडची लोकपरंपरा जगभरात पोहोचली आणि भारतीय लोककलेची वेगळी छाप उमटली.
हे ही वाचा:
श्रद्धेचा पैसा लुटून उभारली कोट्यवधींची संपत्ती!
नौदलाला मिळाले स्टेल्थ कवच; चीन्यांचा चडफडाट
समुद्राने वेढलेला विमानतळ तोही पालघरमध्ये?
विनय सहस्त्रबुद्धे एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष; केतकरांचा पराभव
तीजन बाई यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि नंतर पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एकाने गौरविले होते. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक देशांमध्ये पंडवानीचे सादरीकरण करून भारतीय लोकसंस्कृतीचा झेंडा उंचावला.
त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी तीजन बाई यांचे निधन हे भारतीय कला आणि संस्कृतीसाठी “कधीही भरून न निघणारे नुकसान” असल्याचे म्हटले. त्यांच्या कलेचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
