रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र निंदा केली. त्यांनी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल खोल संवेदना व्यक्त केली आणि दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. पुतिन यांनी या अमानवीय हल्ल्याचे दोषी आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा व्हावी, यावर भर दिला. दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील रणनीतिक भागीदारी अधिक बळकट करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर लिहिले: राष्ट्रपती पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची कडक निंदा केली. त्यांनी निष्पाप लोकांच्या मृत्यूसंबंधी तीव्र दुःख व्यक्त केले आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. या हल्ल्याचे दोषी आणि समर्थकांना न्यायासमोर उभं करावं, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा..
भारतातील २२ पाकिस्तानी महिलांना १०० मुले, कुटुंबातील सदस्य ५००च्या घरात
६० वर्षांची पाकिस्तानी महिलेचे बंगालमध्ये होते ४५ वर्षे वास्तव्य, केली अटक!
या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया विशेषाधिकारप्राप्त रणनीतिक संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय केला. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष पुतिन यांना विजय दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं. दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिनाच्या ८०व्या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
पूर्वी अशी अपेक्षा होती की पंतप्रधान मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होतील, परंतु त्यांच्या न जाण्याचे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. तथापि, पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेली सुरक्षेची परिस्थिती हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. ही भेट, वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांच्या पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी झाली असून, त्यात देशाच्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.