काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा परदेशात जाऊन भारताची बदनामी करताना दिसून आले. अमेरिका दौऱ्यावर ब्राउन विद्यापीठात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मंचावरून निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र निवडणुकीचे उदाहरण देत त्यांनी देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर आणि निवडणूक आयोगाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावर केलेल्या टिप्पणीवरून भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यामुळे राहुल गांधींवर परिणाम झाला असून त्यांनी जनतेमध्ये जावं, जगभरात भारताची बदनामी करून मते वाढणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थानांची बदनामी केली. सातत्याने ते अशी बदनामी करत आहेत, हे निंदनीय आहे.
वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झालेला दिसत आहे. पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे आपल्या देशाचीच बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो कि ते नेमका कोणाचा अजेंडा चालवत आहेत?.
हे ही वाचा :
१८० अधिकाऱ्यांपैकी ४१ टक्के महिला
न्यायाधीशांना जाब विचारणारा इंदिरा गांधींचा जुना व्हीडिओ व्हायरल
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर न्यायमूर्ती गवई काय म्हणाले ?
विशेषतः त्यांना माझा सल्ला आहे कि त्यांनी जनतेमध्ये जाऊन काम केले पाहिजे, जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेची कामे केली तर त्यांची मते वाढतील. पण त्याविरुद्ध भारताला बदनाम करण्याचे ते काम करत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली विधानसभा निवडणुका ते हारले आणि आता ते मतदान प्रक्रियेवर आणि मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अतिशय बाळबोधपणाचा हा प्रकार आहे. त्यामुळे माझे त्यांना आवाहन आहे कि त्यांनी जनतेत जावे आणि भारताची बदनामी करणं बंद करावं.