‘सिया पॉइंट’च्या गर्दीने लोहगड किल्ला धोक्यात; वारसा संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव

सोशल मीडियामुळे पर्यटकांचा ओघ वाढला

‘सिया पॉइंट’च्या गर्दीने लोहगड किल्ला धोक्यात; वारसा संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव

लोहगड किल्ल्यावरील एका ठिकाणाला सोशल मीडियामुळे मिळालेली ‘सिया पॉइंट’ ही ओळख आता ऐतिहासिक वारशासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. या ठिकाणी वाढलेल्या पर्यटकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक पर्यावरण आणि पुरातत्त्वीय वारसा धोक्यात आला असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि वारसा संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटनांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

अलीकडेच घडलेल्या गाजलेल्या गुन्ह्याशी संबंधित चर्चांमुळे या जागेला ‘सिया पॉइंट’ म्हणून सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर इतिहास पाहण्यासाठी नव्हे, तर केवळ या ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक पर्यटक किल्ल्याचा इतिहास, वास्तुकला किंवा वारसा जाणून घेण्याऐवजी थेट ‘सिया पॉइंट’ कुठे आहे, अशीच विचारणा करत आहेत. त्यामुळे लोहगडाची ऐतिहासिक ओळख झाकोळली जात असून त्याचे रूपांतर ‘डार्क टुरिझम’ म्हणजेच दुःखद किंवा संवेदनशील घटनांशी संबंधित पर्यटनाचे केंद्र बनत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
मोरक्कोची विजयी मोहीम; कॅनडाला निरोप

कुर्ल्यात झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या शोपियात फळबागेत लपले लष्करचे दोन अतिरेकी; शोध सुरू

सुवर्ण अक्षरांनी कोरला ‘१००’ चा विक्रम!

वारसा संवर्धन कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात किल्ल्यावर पर्यटकांच्या प्रवेशाचे नियमन करण्याची, संवेदनशील भागात संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची, सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आणि ऐतिहासिक वारशाचे नुकसान टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच सोशल मीडियामुळे निर्माण झालेल्या अनावश्यक आकर्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी काही काळ लोहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला होता. तपासावर परिणाम होऊ नये आणि घटनास्थळ सुरक्षित राहावे यासाठी ही पावले उचलण्यात आली होती. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे लोहगडसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन, जबाबदार पर्यटन आणि सोशल मीडियाच्या प्रभावाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. इतिहासाचा वारसा जपणे आणि पर्यटनाला योग्य दिशा देणे ही काळाची गरज असल्याचे मत वारसा संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Exit mobile version