रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात आज शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. महाविद्यालय आणि इंडियन कौन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट (ICTRD), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, स्टार्टअप आणि रोजगारभिमुख कौशल्य आत्मसात करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आज महाविद्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमाला संस्थेचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या करारानुसार महाविद्यालयात ‘आयसीटीआरडी’च्या ‘प्रज्ञानेट योजने’ अंतर्गत ‘स्टुडंट चॅप्टर’ (Student Chapter) सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रशिक्षण, कार्यशाळा, चर्चासत्रे, औद्योगिक क्षेत्रातील इंटर्नशिप आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. विशेषतः ‘नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020)’ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी आणि इंटर्नशिपसाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
हे ही वाचा:
संभलमधील सरकारी जमिनीवरील मशिदीवर हातोडा
भारत-अमेरिका संरक्षण संबंध बळकटीकरण; आर्मी-टू-आर्मी स्टाफ चर्चा
इराणच्या हल्ल्यावर इस्रायलचे प्रत्युत्तर; राजधानीसह अनेक शहरांवर डागली क्षेपणास्त्रे
अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे: जुना माल द्या, नवा माल घ्या…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची कमतरता भासू नये आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास (Entrepreneurship Development), स्टार्टअप संस्कृती आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून थेट मिळणार आहे. याशिवाय, ‘आयसीटीआरडी’ तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि परिषदांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश गादेवार आणि ‘आयसीटीआरडी’चे सदस्य सचिव डॉ. केतन मोहितकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची. हा करार आमच्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देईल आणि त्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवेल,” असा विश्वास प्राचार्य डॉ. राजेश गादेवार यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांकडून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
