उंबरविहीरची तहान भागली; २४९ कुटुंबांना वर्षभर शुद्ध पाणी

नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

उंबरविहीरची तहान भागली; २४९ कुटुंबांना वर्षभर शुद्ध पाणी

जव्हार तालुक्यातील आदिवासीबहुल उंबरविहीर गावातील नागरिकांचा अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रगती प्रतिष्ठानच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. रेसोनिया लिमिटेडच्या सीएसआर सहकार्याने साकारलेल्या या योजनेमुळे गावातील २४९ कुटुंबांतील १,१७६ ग्रामस्थांना वर्षभर स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

उंबरविहीरमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि कुटुंबीयांना लांब अंतर पायी जाऊन डोक्यावर हंडे वाहत पाणी आणावे लागत असे. या कामात त्यांचा मोठा वेळ आणि श्रम खर्च होत होते. नव्या नळपाणी योजनेमुळे ही कसरत संपुष्टात येणार असून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील विहिरीवर ५ अश्वशक्तीचा सौरऊर्जेवर चालणारा आधुनिक पंप बसविण्यात आला आहे. हा पंप प्रति मिनिट सुमारे १६० लिटर पाणी उपसण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेचा वापर करण्यात आल्याने वीजेवरील अवलंबित्व कमी होणार असून, योजना पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक ठरणार आहे.

   

गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येकी १० हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या, म्हणजेच एकूण २० हजार लिटर पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विहिरीपासून उंचावरील जलकुंभापर्यंत सुमारे ९५० मीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली असून, गावातील सर्व वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी विस्तृत पाइपलाइनचे जाळे उभारण्यात आले आहे. सुरुवातीला गावासाठी २० सार्वजनिक नळकेंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोणतेही कुटुंब पाण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने २४ सार्वजनिक नळपोस्ट उभारण्यात आले. त्यामुळे प्रत्येक वस्तीतील नागरिकांना घराजवळच पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सुमारे ₹२०.५६ लाख खर्चून उभारलेली ही प्रगती प्रतिष्ठानची १४९वी पाणीपुरवठा योजना आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि परिसरातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये संस्थेने यापूर्वीही अनेक पाणीपुरवठा योजना राबवल्या आहेत. या उपक्रमांमुळे महिलांची पाण्यासाठीची पायपीट कमी झाली असून, हजारो महिलांचे मिळून ३० हजारांहून अधिक मानवी श्रमतास वाचल्याचा संस्थेचा दावा आहे.

हे ही वाचा:

लंडनमध्ये मंदिराची जमीन विकली मशिदीला

मध्यपूर्वेत युद्धाची धग वाढली, अमेरिकेला इराणचे चोख प्रत्युत्तर

प्रसूतीनंतर १८ महिलांचा मृत्यू; सात जणी डायलिसिसवर

“मोजतबा खामेनेई ९०% संपलेत”

या योजनेमुळे महिलांचा वेळ आणि श्रम वाचणार असून तो वेळ त्या कुटुंबाची काळजी, शेती, रोजगार, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी देऊ शकतील. त्यामुळे ही योजना केवळ पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित नसून महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासालाही चालना देणारी ठरणार आहे.

रेसोनिया लिमिटेडच्या सीएसआर सहकार्यामुळे आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे साकारलेला हा प्रकल्प ग्रामीण व आदिवासी भागातील विकासासाठी उद्योग आणि सामाजिक संस्थांच्या यशस्वी भागीदारीचे उदाहरण मानला जात आहे. उंबरविहीरमध्ये आज नळातून वाहणारे पाणी हे केवळ मूलभूत सुविधा नसून अनेक वर्षांच्या संघर्षावर मिळालेला विजय आहे. पाण्यासाठी दररोजची धडपड संपून आता गावाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

Exit mobile version