नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये जगभरातील प्रमुख राजकीय नेते आणि धोरणकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. जबाबदार, सर्वसमावेशक आणि नवोन्मेषाधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकासाची दिशा निश्चित करणे आणि भारताला जागतिक एआय गव्हर्नन्सच्या केंद्रस्थानी स्थापित करणे हा या उच्चस्तरीय परिषदेतला मुख्य उद्देश आहे.
स्वीडनच्या उपपंतप्रधान तथा ऊर्जा, व्यवसाय आणि उद्योग मंत्री एबा बुश बुधवारी (१८ फेब्रुवारी) नवी दिल्लीत दाखल झाल्या. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या आगमनाचे स्वागत करताना म्हटले की, ही भेट उदयोन्मुख तंत्रज्ञान, विशेषतः एआय क्षेत्रात भारत- स्वीडन भागीदारी अधिक बळकट करेल. दोन्ही देशांमधील व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, नवोन्मेष, हवामान कृती आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला.
फिनलंडचे राजकारणी पेटेरी ओरपो देखील समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले. त्यांचे स्वागत कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी सांगितले की, ही भेट डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास आणि शिक्षण या क्षेत्रांतील भारत- फिनलंड सहकार्य अधिक दृढ करेल. तसेच स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो शानचेज देखील एआय इम्पॅक्ट समिटसाठी नवी दिल्लीत पोहोचले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या भेटीमुळे भारत- स्पेन ‘ड्युअल इयर ऑफ कल्चर, टुरिझम अँड एआय’ उपक्रमाला नवे बळ मिळेल. त्यांचे स्वागतही राज्यमंत्री जयंत सिंह यांनी केले. यापूर्वी सर्बिया, श्रीलंका, गयाना आणि बोलिव्हिया येथील नेतेही समिटमध्ये सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही सध्या भारत दौर्यावर असून, तेही परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अल्फाबेटपासून मायक्रोसॉफ्ट, चॅनेल, अॅडोबचे सीईओ भारतीय!
आम्हाला माफ करा, लाज वाटते…दिल्ली अपघात; आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया
“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”
भारतामध्ये आयोजित हा समिट यापूर्वी झालेल्या जागतिक एआय परिषदांच्या मालिकेचा पुढचा टप्पा आहे. पहिला जागतिक एआय समिट २०२३ मध्ये ब्रिटनमध्ये झाला होता, जिथे एआय सुरक्षेवर आणि संभाव्य जोखमींवर चर्चा केंद्रित होती. त्यानंतर २०२५ मध्ये फ्रान्स येथे झालेल्या समिटमध्ये मोठ्या गुंतवणुकीवर आणि नियामक चौकटीवर भर देण्यात आला होता. भारतामधील २०२६ चा हा समिट एआय विषयक आकांक्षा प्रत्यक्ष परिणामांत रूपांतरित करण्यावर केंद्रित आहे. ‘पीपल, प्लॅनेट अँड प्रोग्रेस’साठी एआयच्या व्यावहारिक उपयोगाचे प्रदर्शन करणे आणि बहुपक्षीय सहकार्याला चालना देणे हा या परिषदेतला उद्देश आहे. पुढील काही दिवसांत उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका, धोरणात्मक चर्चा आणि प्रमुख भाषणे होणार असून, त्यातून जागतिक एआय गव्हर्नन्स आणि सहकारी नवोन्मेषाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.







