अकबर, बाबर, औरंगजेब हे बलाढ्य बादशहा भारतात होऊन गेले हा गेली अनेक वर्षे जाणीवपूर्वक रुजविण्यात आलेला समज पूर्णपणे पुसून टाकण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला आहे. त्या अंतर्गत एनसीईआरटीच्या आठवीच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात या सगळ्या आक्रमकांचा वास्तववादी इतिहास सांगण्यात आला आहे. त्यात बाबर हा निर्दयी शासक होता असा उल्लेख असून त्याने शहरेच्या शहरे कापून काढल्याची नोंद देण्यात आली आहे. अकबर हा क्रौर्य आणि सहिष्णुता याचे उदाहरण असल्याचे त्यात म्हटले असून औरंगजेबाने अनेक देवळे, गुरुद्वारे उद्ध्वस्त केल्याचे नमूद कऱण्यात आले आहे. यात अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे, ज्यातून त्या काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे ठळकपणे मांडण्यात आली आहेत.
या पुस्तकातील पहिल्या भागात समाजाचा शोध भारतीय आणि त्या पलीकडे याचा समावेश असून ते या आठवड्यात प्रकाशित झाले आहे. दिल्ली सल्तनत आणि मुघल याविषयी प्रथमच विद्यार्थ्यांना अवगत केले जाणार आहे. हा सगळा इतिहास आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातच फक्त समाविष्ट करण्यात आला आहे.
या नवीन पुस्तकातील भारताच्या राजकीय नकाशाची पुनर्रचना (‘Reshaping India’s Political Map’) या प्रकरणात १३व्या ते १७व्या शतकांदरम्यानचा भारतीय इतिहास समाविष्ट आहे. यात दिल्ली सल्तनतचा उदय व पतन, त्याविरोधातील प्रतिकार, विजयनगर साम्राज्य, मुघल साम्राज्य व त्याला झालेला प्रतिकार, तसेच शीखांचा उदय यांचा समावेश आहे.
पुस्तकात दिल्ली सल्तनतचा काळ राजकीय अस्थिरता व सैनिकी मोहिमांनी व्यापलेला होता असे नमूद केले आहे, ज्यात गावांची व शहरांची लूट, मंदिर व शिक्षण स्थळे नष्ट करणे यांचा समावेश आहे. सल्तनत व मुघल काळातील विभागांमध्ये मंदिरांवरील हल्ल्यांचे अनेक उल्लेख आहेत. हे सर्व उल्लेख जुन्या इयत्ता ७वीच्या पुस्तकात नव्हते.
हे ही वाचा:
फिल्म इंडस्ट्रीने स्टंट कलाकारांना पाठबळ देणं गरजेचं
ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत हे विसरले वाटतं
भारतातील साखर कारखान्यांचा महसूल वाढणार
भारतीय फार्मा बाजारात मजबूत वाढ
पुस्तकातील काही संदर्भ:
🔴 अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने “श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम आणि रामेश्वरम अशा हिंदूंच्या केंद्रांवर केलेले हल्ले.”
🔴 दिल्ली सल्तनत काळात “बौद्ध, जैन व हिंदू मंदिरांमधील पवित्र मूर्ती व प्रतिमांवर वारंवार हल्ले झाले; हे फक्त लुटमारीसाठी नव्हते, तर मूर्तिभंजनाच्या उद्देशाने झाले.”
🔴 ‘जिझिया’ कराचा संदर्भ: काही सुलतानांनी मुस्लिम नसलेल्या प्रजेला संरक्षण व सैनिकी सेवेपासून मुक्त राहण्याची मुभा देण्यासाठी हा कर लावला. हा कर सार्वजनिक अपमानाचे कारण ठरत असे व लोकांना इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी आर्थिक व सामाजिक प्रोत्साहन देत असे. जुन्या पुस्तकात हा कर केवळ एक स्वतंत्र कर म्हणून सांगितला होता.
🔴 बाबरबद्दल पुस्तकात लिहिले आहे की त्याच्या आत्मचरित्रानुसार तो सुसंस्कृत व बौद्धिकदृष्ट्या संपन्न होता. “पण तो क्रूर व निर्दयी जेता होता, ज्याने संपूर्ण शहरातील लोकांची कत्तल केली, स्त्रिया व मुलांना गुलाम केले आणि मृतांच्या कवट्यांचे मनोरे उभारण्यात अभिमान बाळगला.” जुन्या पुस्तकात बाबरबद्दल लिहिण्यात आले होते की, त्याला जबरदस्तीने त्याच्या वारसा हक्काने मिळालेल्या सिंहासनावरून हाकलून लावण्यात आले होते. त्याने नंतर काबूल, दिल्ली व आग्रा जिंकली.
🔴 अकबरच्या काळाविषयी म्हटले आहे की, त्याच्या कारकिर्दीला “क्रौर्य आणि सहिष्णुतेचा मिलाफ झाला होता. पण चित्तोडगड किल्ल्यावर हल्ला करताना अकबराने सुमारे ३० हजार लोकांची हत्या करण्याचे आदेश दिले. विजयाचा संदेश देताना म्हटले होते: “अनेक किल्ले व शहरांवर विजय मिळवून तिथे इस्लाम स्थापन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. रक्तासाठी चटावलेल्या आपल्या तलवारीच्या साहाय्याने, आम्ही त्यांच्या मनातील काफिराचे चिन्ह पुसले आणि मंदिरांचा नाश केला.” त्यानंतरही, विविध धर्मांबद्दल सहिष्णुता दाखवूनही, “प्रशासनातील उच्च पदांवर गैर-मुस्लिमांची संख्या अकबराने कमी ठेवली.”
🔴 औरंगजेबविषयी या पुस्तकात म्हटले आहे की, काही विद्वान म्हणतात की त्याचे उद्देश प्रामुख्याने राजकीय होते व मंदिरांना संरक्षण देणाऱ्या त्याच्या आदेशांचा उल्लेख करतात. तरीही, त्याच्या ‘फरमान’ मधून त्याचे वैयक्तिक धार्मिक हेतू स्पष्ट होतात. त्याने प्रांताधिकाऱ्यांना शाळा व मंदिरे नष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच वाराणसी, मथुरा, सोमनाथ, जैन मंदिरे व शीख गुरुद्वारे उद्ध्वस्त केली.
पुस्तकात मुघल व सल्तनत यांच्यातील प्रशासन व्यवस्था, १३ व्या ते १७व्या शतकातील आर्थिक घडामोडी, शहरे व पायाभूत सुविधांची प्रगती आणि १७व्या शतकाच्या अखेरीस आलेल्या आर्थिक संकटाचा उल्लेख आहे. भारतीय समाजाने पुन्हा नव्याने शहरे, मंदिरे, व इतर गोष्टी उभारण्यात दाखवलेली लवचिकता आणि ताकद यावर पुस्तकात भर दिला आहे.
या प्रकरणानंतर मराठ्यांवर एक प्रकरण आहे, ज्यात शिवाजी महाराजांना “दूरदृष्टी असलेला, उत्कृष्ट रणनीतीकार” म्हणून गौरविले आहे. मराठ्यांनी “भारतीय सांस्कृतिक विकासात मोठा वाटा उचलला” असे म्हटले आहे. शिवाजी महाराज हे निष्ठावान हिंदू होते, त्यांनी इतर धर्मांचा आदर करत आपला धर्म पाळला, तसेच नष्ट केलेली मंदिरे पुन्हा बांधली. जुन्या पुस्तकात त्यांना फक्त एक मजबूत मराठा राज्य उभारणारा म्हणून उल्लेखिले होते.
पुस्तकातील इतिहास विभागात, जो दिल्ली सल्तनतपासून औपनिवेशिक काळापर्यंत जातो. त्याआधी “इतिहासातील काळोख्या कालखंडांबद्दल उल्लेख केला आहे. यात सांगितले आहे की युद्ध, अत्याचार, धर्मांधपणा व रक्तपाताने व्यापलेल्या काळांवर अभ्यास करताना आजच्या लोकांना दोष न देता, निष्पक्षपणे पाहावे.







