कर्नाटकमधील एका गावात वाघाच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत थेट वन अधिकाऱ्यांनाच पिंजऱ्यात बंद केलं. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यातील बोम्मलापुरा गावात ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून गावात वाघाचा वावर असून जनावरांवर हल्ले आणि शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी बोम्मलापुरा गावाजवळ वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी एक पिंजरा लावला होता. त्यामध्ये त्यांनी एका वासराला आमिष म्हणून ठेवले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघाने त्या वासराला ठार मारले आणि पुन्हा घटनास्थळी परतही आला. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही वन अधिकारी मंगळवारपर्यंत घटनास्थळी पोहोचलेच नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून त्यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी संतापातून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील वन कर्मचाऱ्यांना वाघाच्या सापळ्यात बंद केले. मोबाईल फोनवर हे कृत्य रेकॉर्ड केले आणि वाघाला पकडण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
हे ही वाचा :
नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की म्हणाल्या, मोदीजींचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव!
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा प्रताप अंगरक्षकाला चापट; शिवीगाळ |
सत्ता गेल्यानंतरही सोनियाबाई जपतायत चीनचे ऋणानुबंध |
ही घटना स्थानिक प्रशासनासाठी धक्कादायक ठरली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत वन कर्मचाऱ्यांची सुटका केली. तसेच या प्रकाराची चौकशी सुरू असून ग्रामस्थांना समज देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही, परंतु जर तक्रार दाखल झाली तर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.







