२६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीत कर्तव्यपथ येथे होणाऱ्या ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा देशभरातील १७ राज्ये आणि केंद्र सरकारचे १३ विभाग असे एकूण ३० चित्ररथ परेडमध्ये दिसतील. परेडची मुख्य संकल्पना ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र – आत्मनिर्भर भारत’ अशी आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा पारंपरिक गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणारा असेल. चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती दाखवली जाणार आहे. यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि उत्सवांमधून उभ्या राहणाऱ्या आर्थिक चळवळीचे दर्शन घडेल.
हे ही वाचा:
डीआरडीओकडून अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचे भव्य दर्शन
अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने खामेनेई बंकरमध्ये
भारताच्या सूत निर्यातीमुळे बांग्लादेशातील कापड उद्योग संकटात
कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘मायक्रो-वेलनेस’
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवामुळे राज्यात मोठी आर्थिक उलाढाल होते. मूर्तिकार, सजावट करणारे कारागीर, वाद्यनिर्माते, फुलविक्रेते आणि लघुउद्योजकांना या उत्सवातून रोजगार मिळतो. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून आत्मनिर्भरतेचेही उदाहरण आहे, असा संदेश या चित्ररथातून देण्यात येणार आहे.
चित्ररथांची निवड तज्ज्ञ कलाकार आणि मान्यवरांच्या समितीमार्फत केली जाते. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांना संधी देण्यासाठी ही निवड प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते. यंदा महाराष्ट्राला पुन्हा एकदा परेडमध्ये स्थान मिळाले आहे. या चित्ररथात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वही अधोरेखित केले जाईल. त्यामुळे यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ साध्या, पण अर्थपूर्ण मांडणीमुळे विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.







