डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना देण्यात आलेला जामीन रद्द केला असून त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यासारख्या गंभीर प्रकरणात जामीन देताना खालच्या न्यायालयाने योग्य बाबींचा पुरेसा विचार केला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ६ जुलै रोजी डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांना अटक केली होती.
अटकेनंतर कल्याण न्यायालयाने १४ जुलै रोजी रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात सरकारी पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीला जामीन मिळाल्यास फिर्यादी डॉक्टर आणि साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो तसेच तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेश रद्द केला. त्यामुळे रमेश म्हात्रे यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर होऊन शरणागती पत्करावी लागणार असून त्यानंतर त्यांना कारागृहात पाठविण्याची प्रक्रिया होणार आहे.
या प्रकरणानंतर डॉक्टर संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर भूमिका घेण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
हे ही वाचा:
तृणमूलच्या खात्यांमधील १६४ कोटींच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी
आता पाकिटात येणार प्लास्टिकच्या नोटा!
अभिषेक बॅनर्जींचे पाच मजली कार्यालय करणार उद्ध्वस्त
ट्रम्पना ठार करणाऱ्याला १ कोटी डॉलर; इराणसमर्थित गटाची घोषणा
रमेश म्हात्रे यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती. डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता उच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.







