दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा झालेला मृत्यू हा कलिंगड खाल्ल्याने झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या व्हिसेरा अहवालात या कुटुंबाच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ (Zinc Phosphide) या अत्यंत विषारी रसायनाचे अंश सापडले असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. हे रसायन प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते.
दक्षिण मुंबईतील पायधुनी,घाटी गल्ली, मोगल इमारत येथे राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबात २५ एप्रिलच्या रात्री नातेवाईकांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. पाहुणे गेल्यानंतर रात्री उशिरा अब्दुल्ला डोकाडिया (४४), त्यांची पत्नी नसरीन (३५), मुली आयेशा (१६) आणि झैनेब (१३) यांनी कलिंगड खाल्ले होते. मात्र, २६ एप्रिलच्या पहाटे या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा:
राज्यपालांनी ममता सरकार केले बरखास्त
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग
ताज आणि ट्रायडंट हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ताब्यात
राहुल गांधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरण
सुरुवातीला या कुटुंबाचा मृत्यू कलिंगडातून झालेल्या विषबाधेमुळे झाल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मृतांच्या व्हिसेरा तपासणीत ‘झिंक फॉस्फाईड’चे घातक अंश आढळले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे रसायन शरीरात गेल्यानंतर अत्यंत वेगाने संसर्ग पसरवते अशी माहिती समोर आली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विषारी रसायन कलिंगडवर लावण्यात आले होते. हे विषारी रसायन अन्नातून चुकून शरीरात गेले की या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलावे असे कोणतेही ठोस कारण आतापर्यंतच्या तपासात समोर आलेले नाही.
“आम्ही नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. हे विषबाधेचे प्रकरण नेमके कसे घडले, याचा अधिक तपास जे. जे. मार्ग पोलीस करत आहेत.” – पोलीस अधिकारी
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आता हे विष अन्नात मिसळले कसे, याचा शोध घेत आहेत.







