राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनामा नाट्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. स्वत: आव्हाड यांनी देखील माझ्यावरचा गुन्हा षडयंत्राचा भाग आहे असा आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही राजकीय व सूडभावनेतून कारवाई केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
रविवार, १३ नोव्हेंबर रोजी कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्याने आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतरच्या घडामोडींमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
हे ही वाचा:
आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू
आव्हाड यांच्या राजीनाम्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता राजीनामा दिला कि नाही हे आपल्याला माहिती नाही असे त्यांनी सांगितले. महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नियमानुसार चौकशी करतील. तपास करतील. पडताळणी करतील. तक्रारीत तथ्य असेल तर पुढची कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आव्हाड हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. कालच आम्ही एका कार्यक्रमात एकत्र हजर होतो. आमचं सरकार कोणतीही कारवाई सूड , राजकीय भावनेतून करत नाही. करणार नाही. पोलीस तपास करतील त्यात पारदर्शकता असेल. पोलिसांवर कोणताही दबाव नाही. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मुंब्य्रामध्ये टायर जाळण्यासारख्या घटना घडल्या. या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार नियमानं लोकशाहीनं चालतं. लोकशाही मार्गानं आंदोलन करणं ठीक आहे. पण कायदा हातात घेणं कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.