राज्यात मान्सूनचे उशिरा का होईना जोरदार आगमन झाले आहे. जून महिन्यात कमी पडलेल्या पावसाने जुलै महिन्यात कोसळण्याची तयारी केली आहे. ३० जूनला मुंबईसह कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला. पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊल पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबईत पुढील ४ दिवस धुवांधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबईत आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी १ जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी १०० मिमीहून अधिक पाऊस पडू शकतो. तर, ३ ते ४ जुलै रोजी कोकणात अतिवृष्टीची शक्यता असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगली पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
‘पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही…’आंदोलकांची घोषणा
सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला; निफ्टी २३,९०० च्या खाली
पश्चिम आशियातील संघर्षाची जगाला मोठी किंमत
रायगड जिल्ह्याला पुढील ५ दिवस पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला असून, रायगडच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे.रायगडमध्ये पावसाने दोन दिवस दडी मारली होती. मात्र कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दिवसात शेतीची लावणी सुरू होण्याची शक्यता आहे.







