भारताचा स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मात्र यावेळी त्याने आपल्या बायकोलाच मारहाण केल्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याची बायको आंद्रिया हिने म्हटले आहे की, बांद्रा रेक्लेमेशन येथील जेडब्ल्यूएल हौसिंग सोसायटीतील घरात दारू प्यायल्यानंतर त्याने आपल्यावर हल्ला केला. घाणेरड्या भाषेत आपल्याशी तो बोलला आणि आक्रमक झाला होता.
बांद्रा पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अद्याप यासंदर्भात अटक वगैरे केलेली नाही.
हे ही वाचा:
सत्यजीत तांबे यांनी नाना पटोलेंचे उघडे पाडले पितळ; चुकीचे एबी फॉर्म दिले
आव्हाड आहेत, म्हणून इतिहास आहे!
राम मंदिर उडवण्याची धमकी; आठ संशयितांच्या मुसक्या आवळल्या
बांद्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आंद्रिया पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यांनी विनोद कांबळीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे विनोद कांबळी हा घरात दारू पिऊन शिवीगाळ करत होता. त्यादरम्यानच त्याने तव्याचे हँडल आंद्रियाच्या दिशेने फेकून मारले. त्यामुळे आंद्रियाच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर त्याने क्रिकेट बॅटच्या सहाय्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ती बॅट त्याच्या हातातून खेचून बाजूला फेकली आणि नंतर आपल्या दोन मुलांना घेऊन ती घरातून निघून गेली.
घराबाहेर पडल्यानंतर आंद्रिया यांनी भाभा हॉस्पिटल गाठले आणि स्वतःवर प्रथम उपचार करून घेतले आणि नंतर बांद्रा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यावेळी त्यांनी आपला जबाब नोंदविला आणि वैद्यकीय उपचार केल्याचे प्रमाणपत्रही पोलिसांना दिले.
बांद्रा पोलिस म्हणाले की, आम्ही घातक ठरू शकेल अशा वस्तूने मारहाण केल्याचा गुन्हा कांबळीवर दाखल केला आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचेही कलम त्यात आहे.
विनोद कांबळी याने क्रिकेटपटू म्हणून स्वतःची एक छबी तयार केली होती. सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख होती. मात्र आपल्या स्वभावामुळे, वागणुकीमुळे तो हळूहळू क्रिकेटपासून दूर होत गेला. १७ कसोटीत तो खेळला आणि त्याने १०८४ धावा केल्या. १०४ वनडे क्रिकेटमधून त्याने २४७७ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन दुहेरी शतकेही आहेत.