पिंपरी चिंचवड कसबा पोटनिवडणुकीची आता चर्चा होऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहिले आहे. लोकप्रतिनिधीचे निधन होते तेव्हा ती निवडणूक शक्यतो बिनविरोध करावी अशी भूमिका त्यांनी पत्राच्या रूपात मांडली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. मी या मताचा आहे की, विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा ती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. कारण तेथील जनतेचा कौल हा त्या लोकप्रतिनिधीला असतो. तसाच कौल त्या पक्षालादेखील असतो.
राज ठाकरे म्हणतात की, अनेकवेळा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातीलच असतो. अशावेळी पक्षाने जर त्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली असेल तर त्या त्याला बिनविरोध निवडून देणे ही संस्कृती आहे. या प्रकारच्या राजकीय संस्कृतीतून आपण निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच देत नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांनी यासंदर्भात विचार करून ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन करतो. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
बिल गेट्स यांनी चक्क बनवल्या पोळ्या..मोदी म्हणाले, उत्कृष्ट
क्रिकेटपटू विनोद कांबळीने पत्नीला केली मारहाण; गुन्हा दाखल
गोड वाणी झाली निशब्द… गायिका वाणी जयराम यांचे निधन
या निवडणुकीत कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. त्या ठिकाणी आता हेमंत रासने यांना उमेदवारी भाजपाने दिली आहे तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचेही नुकतेच निधन झाले. तिथे त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संजय राऊत म्हणतात, बिनविरोध होणार नाही
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी मात्र कितीही फोन केले, पत्र लिहिली तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे म्हटले आहे. तसेच या निवडणुकीत पराभूत होण्याची भीती असल्यामुळे भाजपाने आता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.