मुंबई- एकीकडे सुरक्षा यंत्रणा घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे हद्दपार केलेल्या बांगलादेशी नागरिकांचे पुन्हा मुंबईत पाय पसरणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी हद्दपार केलेल्या बांगलादेशी दांपत्याने केवळ ३० हजार रुपये देऊन दलालांच्या मदतीने जंगलाच्या वाटेने पुन्हा मुंबई गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दादरच्या भोईवाडा पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोईवाडा पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाला (एटीसी) दादर (पूर्व) येथील दादासाहेब फाळके रोड परिसरात संशयास्पद बांगलादेशी दांपत्य येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून भोवंडा मशिदीजवळ या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, ही व्यक्ती ल्टन शोहिद मुल्ला (४३) आणि पापी बेगम (३७) असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघे बांगलादेशातील नोराईल जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्याकडे बांगलादेशी ओळखपत्रे सापडली आहेत.
हे ही वाचा:
तृणमूलच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा
पश्चिम आशियातील तणावाचा अमेरिकेला आर्थिक लाभ
बनावट स्वाक्षरी प्रकरणी तृणमूल मुख्यालयात सीआयडी चौकशी
हे दांपत्य मूळचे बांगलादेशातील असून, १४ जुलै २०२५ रोजी त्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे हद्दपार (डिपॉर्ट) करण्यात आले होते. मात्र, १० महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी दलालांशी हातमिळवणी करत जंगलाच्या वाटेने पुन्हा भारतात प्रवेश केला आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे लपून राहत होते.
हद्दपार केलेल्या घुसखोरांच्या पुन्हा मुंबईत येण्याच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हाने वाढली आहेत. अशा प्रकारे घुसखोरी करणाऱ्यांमध्ये दलालांचे मोठे जाळे सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ ३० हजार रुपयांच्या मोबदल्यात हे दलाल जिवाची बाजी लावून घुसखोरांना मुंबईपर्यंत पोहोचवत आहेत.
नर्गिस विलायत शेख हिला मीरा रोडवरून अटक करण्यात आली. दलालांना पैसे देऊन ती नेपाळमार्गे पुन्हा भारतात आली होती.
दोन बांगलादेशी महिलांना जानेवारी २०२६ मध्ये धारावी आणि कमाठीपुरातून अटक करण्यात आली.एका महिलेने जुलै २०२५ मध्ये हद्दपार झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पश्चिम बंगाल सीमेतून भारतात पुन्हा प्रवेश केला आणि ती मुंबईत मजुरी करत होती.







