जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने आयोजित केलेले आंदोलन मागे घेतले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी जल्लोषही साजरा केला. आता सरकारने तांदळातील खडे शोधण्याचे काम सुरू केले आहे. आंदोलनाच्या नावाखाली अराजक माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. सरकारची नजर आहे हे लक्षात आल्यामुळे काही चतुर आंदोलकांनी न्यायालयात धाव घेतली होती. सरकार ‘प्रायव्हसी’वर (गोपनीयतेवर) घाला घालत असल्याचा आरोप दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत करण्यात आला होता. प्रभू श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंदोबस्तावर असलेले वर्दीतील पोलीस या सगळ्यांना अर्वाच्च शिव्या घालून त्यांचे ‘रील्स’ सोशल मीडियावर पोस्ट करणारे आता प्रायव्हसीच्या ढालीमागे लपतायत. कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषण मागे घेताना त्यांनी आंदोलनात हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. सरकारलाही माहिती होते की, पेपरफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही दाखवायची अन् सांगायची कारणे आहेत. भारतात नेपाळ आणि बांगलादेशची पुनरावृत्ती घडवणे हाच या आंदोलनाचा हेतू होता. अभिजित दीपकेची त्यासाठी अमेरिकेत व्यवस्थित शिकवणी झाली होती. अरविंद केजरीवाल यांनी इथे जय्यत तयारी करून ठेवली होती. डावे, काँग्रेसवाले, समाजवादी सगळेच तयारीत होते. गुप्तचर यंत्रणांकडेही अशी माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी आंदोलनावर तंत्रज्ञानाचा वापर करून करडी नजर ठेवली असली, तर त्यावर हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते



