पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्यातील बारुईपूर परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, बलात्काराच्या आरोपांची अधिकृत पुष्टी न्यायवैद्यक आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शनिवारी संध्याकाळी घराजवळील दुकानात खरेदीसाठी गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. रविवारी सकाळी सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांचा आरोप आहे की, चार युवकांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला.
हे ही वाचा:
६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा झाला विवाहबद्ध
दिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक
एम्बाप्पेचा सुवर्ण वार! फ्रान्सची क्वार्टर फायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री
‘सिया पॉइंट’च्या गर्दीने लोहगड किल्ला धोक्यात; वारसा संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले. संतप्त नागरिकांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून निषेध आंदोलन केले आणि आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रभास मंडल नावाच्या एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण आणि लैंगिक अत्याचार झाला की नाही, याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायवैद्यक आणि फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
