महाराष्ट्रात आता सर्वदूर पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. कुठे रस्तेच पाण्याने वाहून गेलेत तर कुठे झाडे पडत आहेत. झाडे पडल्यामुळे काही लोक मृत्युमुखी पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये चक्क रस्ता दुभंगून त्यातून पाण्याचा फवारा आल्याची विचित्र घटना घडली आहे.
तळेगावात (पुणे) रस्ता दुभंगला आणि जमिनीतून पाण्याचा प्रचंड फवारा उसळला..!
हा नैसर्गिक चमत्कार नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या निकृष्ट कामांचा स्फोट आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करून उभारलेला 'विकास' आता अक्षरशः रस्त्यावर फुटू लागला आहे.
महाराष्ट्राला जाहिरातींचा विकास नको, तर जबाबदारी… pic.twitter.com/ntHZfDrniB
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 5, 2026
शहरातील एका डांबरी रस्त्याच्या मधूनचं अचानकपणे पाणी येऊ लागले आणि हळूहळू रस्ता दुभंगला आणि त्यातून पाण्याचा फवारा बाहेर आल्याचा व्हीडिओ व्हायरल होतो आहे. यावेळी रस्ताचं फुटला की काय? असे वाटल्याने लोक भयभीत झाले. रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील हलगर्जीपणामुळेच हे घडल्याचे समोर येते आहे. हा कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर लोक संतप्त झाले आहेत.
दीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करून नवा रस्ताही बनवला गेला होता. पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचे ठरले होते पण तेवढ्यात सगळी पोलखोल झाली.
हे ही वाचा:
विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता
कुर्ल्यात झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध
बाबर आजम पुन्हा पाकिस्तानचा कसोटी कर्णधार!
ही थरारक आणि अचंबित करणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यात नेमका दोष कसला आहे याचा तपास केल्यावर लक्षात आले की, पाईपलाईन जोडणी करताना, कंत्राटदाराने दोन पाईप चुकीच्या पद्धतीने एकमेकांना जोडले होते. या प्रकरणाची गंभीर दखल तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी घेतली आहे. संबंधित कंत्राटदाराकडूनच पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू होताच पाईपलाईनमधील त्रुटी उघड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित कामाची गुणवत्ता आणि त्यावर झालेल्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







