एकीकडे अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीची चर्चा होत असताना आता मंदिराला दिलेली ५ कोटींची सोन्याची रामचरितमानसची प्रत गायब झाल्याचा आरोप दान कर्त्या आयएएस अधिकाऱ्याने केला आहे. माजी आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन यांनी सार्वजनिकरित्या आरोप केला आहे की, सुमारे ५ कोटी रुपये किंमतीची सोन्याचा मुलामा दिलेली रामचरितमानसाची प्रत राम मंदिरातून हलवण्यात आली आहे.
लक्ष्मीनारायणन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाने एप्रिल २०२४ मध्ये ही विशेष रामचरितमानसाची प्रत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दान केली होती. मात्र, नंतर ही प्रत मंदिर परिसरातून अन्यत्र हलवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, ट्रस्टचे तत्कालीन महासचिव चंपत राय यांनी त्यांना सांगितले होते की, “मंदिराला मिळणारे प्रत्येक दान मंदिरात प्रदर्शित करणे शक्य नसते.”
यापूर्वी चांदीच्या दानावरही प्रश्न
यापूर्वी विरोधी पक्ष आणि इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन यांनी राम मंदिराला दान करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील चांदीच्या विटा आणि बार गायब झाल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंदिर बांधकामादरम्यान दान केलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचाही उल्लेख होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने सुमारे २०० किलो चांदी चोरीला गेल्याच्या दाव्याला फेटाळून लावले होते.
हे ही वाचा:
राम मंदिर चोरी प्रकरणातील टिन्नू यादव अखिलेश यादवांच्या संपर्कात?
सुवर्ण अक्षरांनी कोरला ‘१००’ चा विक्रम!
कुर्ल्यात झाड अंगावर कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
बरे झाले, उद्धव ठाकरेंना श्रीरामाची आठवण झाली!
चोरीचे दागिने वितळवले गेल्याचा संशय
राम मंदिरातील कथित दान अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला संशय आहे की, चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवून सोन्याची बिस्किटे तयार करण्यात आली, जेणेकरून त्यांची मूळ ओळख नष्ट होईल. अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवूनही कथित चोरीचे दागिने सापडले नसल्यामुळे हा संशय अधिक बळावल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरींचे स्पष्टीकरण
दान अपहाराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दोन पानांचे निवेदन जारी केले. त्यांनी स्पष्ट केले की, दानाची मोजणी करण्याच्या प्रक्रियेत त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. मंदिरातील दानाचा कथित अपहार ही अत्यंत धक्कादायक घटना असून त्यामुळे भगवान श्रीरामाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार हा अपहार बराच काळ सुरू होता, ही बाब अधिक वेदनादायक आहे.
दान मोजणीसाठी नवीन सुरक्षा व्यवस्था
या वादानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दान मोजणी प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन स्तरांवर सुरक्षा तपासणी केली जाईल. सर्व कर्मचाऱ्यांसाठी खिसे नसलेला गडद निळ्या रंगाचा गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे, जेणेकरून रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू लपवण्याची शक्यता राहणार नाही. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, दान व्यवस्थापन आणि सुरक्षेतील त्रुटींचीही चौकशी केली जात आहे.







