छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टर्मिनल १) एका तरुणीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या परीक्षेला जाण्याच्या बहाण्याने एका भामट्याने तरुणीला ३१ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या असून प्रवाशांना लुटणारी ही टोळी मुंबई विमानतळ परिसरात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार निधी ललित जैन (वय १९, रा. मालाड) या ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास दिल्लीहून विमानाने मुंबईत आल्या होत्या. विमानतळावरील बेल्ट क्रमांक ३ च्या बाजूला त्या मोबाइल चार्जिंग करत असताना एक संशयित इसम त्यांच्याजवळ आला. ‘माझे नाव इसुकपल्ली असून माझी लखनऊची फ्लाईट रद्द झाली आहे आणि मला परीक्षेत पोहोचायचे आहे,’ असे सांगून त्याने तरुणीकडे मदतीची याचना केली.
हे ही वाचा:
कोलकाता डीसीपी शांतनु सिन्हा बिस्वास यांच्या विरोधात लुकआउट नोटीस
भांडुपमधील निवृत्त बँक व्यवस्थापकाला ४० लाखांना लुटले
प. बंगालमधील भाजपाच्या प्रचंड विजयानंतर अनेक वर्षे बंद असलेले दुर्गा मंदिर खुले
संशयिताने तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपले आयकार्ड आणि हॉलतिकीट दाखवून, पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने मोबाइलमधील ॲपच्या माध्यमातून क्युआर कोड (QR Code) जनरेट केला आणि निधी यांनी तो स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून ३१ हजार ८०० रुपये ट्रान्सफर झाले. काही वेळाने हे पैसे ‘इसुकपल्ली जॉन प्रकाश’ या नावाच्या खात्यावर गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. निधी यांनी १ मे रोजी या क्रमांकावर संपर्क साधला असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना धमकी दिली. त्यानंतर पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.विमानतळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
विमानतळावर टोळी सक्रिय
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून, प्रवाशांना फसवणारी एक टोळी येथे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. भामटे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची व प्रवाशांची सहानुभूती मिळवून त्यांना आर्थिक गंडा घालत आहेत. अशा वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता सतर्क राहणे आवश्यक आहे.







