उत्तर प्रदेशातील शामली येथे कथित धर्मांतर प्रकरणामुळे देशभर चर्चेत आलेल्या आयुष मलिक प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. काही आठवड्यांपूर्वी इस्लाम स्वीकारल्याचे सांगणाऱ्या आणि स्वतःला ‘मोहम्मद अली’ म्हणून संबोधणाऱ्या आयुष मलिकने आता पुन्हा स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे. त्याचा पूजा-अर्चना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये त्याने कुटुंबाच्या इच्छेचा आदर करत सनातन धर्मात परतल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये आयुष म्हणतो, “मी इस्लाम स्वीकारला होता आणि धर्म बदलला होता. पण माझ्या आई-वडिलांचे दुःख पाहून आणि कुटुंबाचा विचार करून मी माझ्या स्वतःच्या इच्छेने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. आता मला माझ्या कुटुंबासोबतच राहायचे आहे.” आयुषचे वडील देवराज मलिक यांनी मुलाने विधिवत सनातन धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे. त्यांनी यापूर्वी आरोप केला होता की, फिजिओथेरपिस्ट चांदनी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांनी नियोजनबद्ध कट रचून आयुषचे ब्रेनवॉश केले, त्याचे धर्मांतर घडवून आणले आणि त्याला ‘मोहम्मद अली’ हे नाव देण्यात आले. तसेच कोट्यवधी रुपयांच्या कौटुंबिक मालमत्तेवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
देवराज मलिक यांनी केलेल्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर चांदनी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आणखी काही संशयितांविरुद्धही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशी सुरू ठेवली आहे.
एफआयआरनुसार, आयुष मलिक हा बी-फार्मा पदवीधर असून कुटुंबाच्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. २०१८ मध्ये पायाच्या दुखापतीवर उपचार घेत असताना त्याची ओळख फिजिओथेरपिस्ट चांदनी कुरेशीशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि हळूहळू आयुषवर इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रभाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २०२३ मध्ये आयुषला दिल्लीला नेण्यात आले, तेथे त्याचे धर्मांतर करून त्याला ‘मोहम्मद अली’ हे नाव देण्यात आले आणि निकाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना निकाहचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले होते, कारण काही आठवड्यांपूर्वी आयुषने माध्यमांसमोर येत इस्लाम स्वीकारणे हा स्वतःचा निर्णय असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्याने, “मी मुस्लिम आहे आणि पुन्हा हिंदू धर्मात जाणार नाही,” असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याने वडिलांनी बाहेरील दबावाखाली तक्रार दाखल केल्याचाही आरोप केला होता. आता मात्र त्याच आयुषने हिंदू धर्मात परतल्याचा दावा केल्याने या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्या भूमिकेतील बदलामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगली असून, तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
“पाण्याच्या हक्कावर दावा करणाऱ्यांचे हात तोडू” पाक मंत्र्याची भारताला धमकी
स्वदेशी ‘गगन’च्या सहाय्याने इंडिगोच्या जेटचे पहिले यशस्वी लँडिंग! काय आहे तंत्रज्ञान?
आरोग्य, संरक्षण ते अंतराळ क्षेत्रापर्यंत भारत- सेशेल्समध्ये १९ महत्त्वाचे करार
खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री, बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील फसवणूक, बनावट कागदपत्रे, धमकी आणि इतर कलमांसह उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. काही आरोपींना अटक झाली असली तरी उर्वरित बाबींचा तपास अद्याप सुरू असून, धर्मांतर स्वेच्छेने झाले की दबावाखाली, याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.







