29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरसंपादकीयजरांगे तुमच्या मालकाला झेपेल एवढंच बोला!

जरांगे तुमच्या मालकाला झेपेल एवढंच बोला!

जरांगेंना फडणवीसांवर सोडण्यात आले आहे.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी फुंकणाऱ्या माणसाचे चिन्ह मिळाले आहे. हा तुतारी फुंकणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटीलच आहे, ही बाब आता पुरेशी उघड झालेली आहे. जरांगे पवारांच्या तालावर नाच नाच नाचतो आहे. फडणवीसांचा एकही खासदार जिंकून येणार नाही, असे खुले आव्हान जरांगेनी दिलेले आहे. महायुती सरकारने एसआयटीची घोषणा केल्यापासून जरांगे डोक्यावर पडल्यासारखा बोलतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात जरांगेच्या मालकाला झेपले नाही, ते करण्याचा दावा जरांगे करतोय.

देशाच्या राजकारणात झंडे गाडण्याचे स्वप्न पाहाणारे शरद पवार सध्या बारामती वाचवण्यासाठी धडपडतायत. राज्यातील महायुती सरकारचा अश्वमेध रोखण्यासाठी पवारांच्या भात्यात सध्या जातीचे शस्त्र उरलेले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांना जातीच्या राजकारणाला खतपाणी घालणारा नेता असा शिक्का मारल्यानंतर उघडपणे जाती-जातीत आग लावण्याचा उद्योग पवार करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जरांगेना फडणवीसांवर सोडलेला आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले, नोकरभरतीही सुरू केली. त्यामुळे फडणवीसांचे राजकारण बुडवण्याचा जरांगेचा मनसुबा उद्ध्वस्त झाला. आरक्षण दिले असल्यामुळे आंदोलनही संपले. एसआयटीचा बांबू दिल्यामुळे रास्ता रोको आणि जाळपोळीसारखे प्रकार करता येत नाही. सगळ्या बाजूनेच गोची झाल्यामुळे जरांगे सध्या फडणवीसांच्या विरोधात पिंका टाकण्याचे काम करतोय.

हा पाचवी पास माणूस फडणवीसांना म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना अहो-जाहो करणार नाही, अशा बाता करतोय. त्यामुळे जरांगेचा उल्लेख अहो जाहो असा करावा, की एकेरी असा प्रश्न आम्हालाही पडलाय. परंतु अशी भाषा वारपण्यासाठी अडाणी असण्याबरोबर असंस्कृत असण्याचीही गरज असते, त्यामुळे आम्हाला हे शक्य नाही. फडणवीसांसारखा खालच्या दर्जाचा गृहमंत्री झाला नाही, फडणवीसांची वृत्ती नीच आहे, तू मला सागर बंगल्यावर येऊ दिले असते तर कळले असते, ही जरांगेंची भाषा. मराठा आरक्षणचा विषय कधीच संपलेला आहे. सध्या फक्त चिखलफेक एवढाच अजेंडा राबवण्याचे काम जरांगे करतायत.

हे ही वाचा:

मुंबई: १९ वर्षीय नोकराने आपल्या मालकिणीचा गळा घोटला!

ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

जरांगे मराठवाड्याचे आहेत, फडणवीस नागपूरचे त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारे शत्रुत्व असण्याचे कारण नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणाची झुंज सुरू असेल तर ती शरद पवार आणि फडणवीसांची आहे. ही खडाखडी २०१४ पासून सुरू आहे. त्यात पवारांच्या प्रत्येक डावपेचाला फडणवीस पुरून उरलेले दिसतात. पवारांची अंतिम गढी २०२४ निवडणुकीत उखडून टाकण्याची पूर्ण योजना तयार आहे, ती कार्यान्वितही झालेली आहे. शरद पवारांसाठी ही लढाई आरपारची आहे. त्यामुळे शरद पवार आणि रोहित पवार जे स्वत: करू शकत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी ते जरांगे नावाच्या हस्तकाकडून करून घेत आहेत. जरांगेंना फडणवीसांवर सोडण्यात आले आहे. त्यामुळे जरांगे आज छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यापैकी कुणावरही न बोलता फक्त फडणवीसांना टार्गेट करतायत कारण मालकाचा तसा हुकूम आहे.

४८ पैकी एकही खासदार जिंकून येऊ देणार नाही, असा दम जरांगेनी दिला आहे. बोलताना आपली कुवत किती याचा विचार त्यांनी केला असता तर बरे झाले असते. ४८ जागांवर भाजपाचे उमेदवार पाडण्याची क्षमता शरद पवारांमध्ये नाही, ती पवारांचा भाडोत्री असलेल्या जरांगेंमध्ये कुठून येणार. वर्षोनुवर्षे साडे तीन जिल्ह्यांच्या पलिकडे उडी न गेलेल्या शरद पवार यांचे जरांगे यांना कौतुक वाटू शकते. ‘काय पवार साहेबांची ऊर्जा आहे’, असे वाटून त्यांचे डोळे दिपतही असतील. परंतु ही त्यांची वैयक्तिक समस्या आहे.

शरद पवार देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकतात, असा गैरसमज काही काळापूर्वी महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचाही होता. हा भ्रमाचा भोपळा फोडण्याचे काम सोशल मीडियाने चोखपणे केले. सोशल मीडियाचे मठाधिपती असलेले राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांत अग्रणी होते. भ्रमाच्या भोपळ्याचे आता भरीत झाले आहे, परंतु जरांगेंसारखे बरेच अजूनही हा भ्रम कवटाळून जगतायत, ही त्यांची व्यक्तिगत समस्या आहे. ४८ जागांबाबत जरांगे जे भाकीत करतोय, त्याचा उगम या समस्येतच आहे.

ज्याच्याकडे ४८ जागा पाडण्याची क्षमता असते तो आपले १०-१२ जिंकून कसे येतील याचा विचार करेल. पवारांना आजतागायत खासदारांची दोन आकडी संख्या पाहण्याचे भाग्य लाभलेले नाही. इथेही मालकाची दमछाक झाली ते जरांगेला कसे झेपेल? त्यामुळे जरांगेंनी हे सुके दम देण्यासाठी दुसरा कोणी नेता शोधावा. ज्याने पवारांना पाणी पाजले त्या फडणवीसांच्या वाट्याला जाऊ नये.

एसआयटीच्या स्थापनेपासून जरांगेना तुरुंग दिसू लागलाय. मराठा आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात झालेली जाळपोळ आणि दगडफेक आपल्याला तुरुंगापर्यंत नेणार अशी स्वप्नही त्यांना पडत असावीत. त्यामुळे फडणवीस तू मला तुरुंगात टाक मग मराठे काय करतायत ते बघ, अशा धमक्या देण्याचे काम अहो रात्र सुरू आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा