32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरसंपादकीयसचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

Google News Follow

Related

विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वाधिक गाजलेला मुद्दा कोणता जर असेल तर तो निर्विवादपणे एपीआय़ सचिन वाझे यांचा होता.

ठाण्याचे रहीवासी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्यानंतर वाझेच या प्रकरणात दोषी असून त्यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोप विमला मनसुख यांनी केला. मनसुख यांच्या पत्नी विमला मनसुख यांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवला होता.

फडणवीसांचा पवित्रा इतका आक्रमक होता की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वाझे यांची बदली करणार असे सरकारला जाहीर करावे लागले. ठाकरे सरकारही एका मर्यादेपलिकडे वाझे यांचा बचाव करू शकत नाहीत याचे हे संकेत होते.

नागरी संवाद केंद्रात वाझे यांची बदली करण्यात आली. त्याच दिवशी एसबी-१ मध्ये पुन्हा त्यांची बदली करण्यात आली. एकाच दिवसात दोनदा बदली त्यांच्या वाट्याला आली.

वाझे यांना अटक करा अशी मागणी भाजपाने लावून धरली. देवेंद्र फडणवीस याप्रकरणात तुफान भडीमार करत होतेच, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही वाझेंचे प्रकरण लावून धरले. त्यांना अटक करावी अशी मागणी सातत्याने केली. वाझे यांच्या अडचणी वाढत होत्या. अशात आजच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे वाझे पुन्हा चर्चेत आले.

हे ही वाचा:

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

‘संयम संपला आता, जगाला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे…’

या स्टेटसमध्ये काय म्हटलंय ते सविस्तर वाचा…
३ मार्च २००४ ला माझ्या सीआयडी मधील सहकाऱ्यांनीच मला एका खोट्या केसमध्ये अटक केली. आजही ती अटक अनिश्चित आहे. हाच इतिहास पुन्हा घडणार असे वाटत आहे. माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवू पाहत आहेत. आजच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. तेव्हा माझ्याकडे आशेची, संयमाची, आयुष्याची आणि नोकरीची १७ वर्ष होती. पण आज माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना नोकरीची आहेत, ना जगण्याच्या संयमाची आहेत. मला असे वाटते की जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे.”

वाझे ज्या २००४ च्या प्रकऱणाचा उल्लेख करतायत ते मुंबई पोलिसांच्या इतिहासातले अत्यंत कुख्यात आणि गाजलेले ख्वाजा युनुस प्रकरण. ख्वाजाचा घाटकोपर बाँबस्फोटात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. अटकेनंतर तो फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी पुढे त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिस कोठडीत झालेल्या या हत्येचा ठपका १४ पोलिसांवर ठेवण्यात आला. त्यापैकी चार जणांवर खटला चालला. वाझे त्यातले एक होते. २००४ पासून त्यांनी निलंबनाची कारवाई झेलली.

विद्यमान पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह यांनी २०२० मध्ये निलंबन रद्द करून वाझेंना पोलिस दलात पुन्हा बहाल केले. नीयती प्रत्येकाला एक संधी देते, वाझेंनाही ती मिळाली, परंतु त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही. पोलिस खात्यात दाखल झालेले वाझे पूर्वीच्या अनुभवातून शहाणे झाले होते असे म्हणण्यास वाव नाही.

हे ही वाचा:

दोन मिनिटाच्या ‘त्या’ सीनने केली ‘धमाल’

यशवंत सिन्हा झाले तृणमूलवासी

मनसुख प्रकरणात वाझे यांचा वावर सुरुवातीपासून संशयास्पद होता. त्यांचे मनसुख यांच्याशी जुने संबंध होते. अँटालियाच्या बाहेर जिलेटीन स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पियो काही महिने त्यांच्या ताब्यात होती असे उघड झाले आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या पत्रात नाव आल्यामुळे अर्णब गोस्वामी यांना तुरुंगात जावे लागले. इथे तर मुनसुख यांची हत्या झाली असून त्यांच्या पत्नीने वाझेंवर खूनाचा आरोप केला आहे. वाझे आता अटक पूर्व जामीनासाठी धडपडतायत. त्यांचे पाठीराखे त्यांना वाचवू शकत नाही, अशी खात्री झाल्यामुळे बहुधा त्यांनी कायदेशीर मार्गाने अटक टाळण्याची चाचपणी सुरू केली आहे.

वाझे यांचे व्हॉट्सअप स्टेटस सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे, अशी कुजबुज आहे. परंतु त्यात तथ्य असण्याची शक्यता कमी. ख्वाजा युनस प्रकरणात त्यांनी जे काही भोगले ते भयंकर आहे. मनसुख हत्याप्रकरणात तेच आता पुन्हा आपल्यासमोर वाढून ठेवलंय की काय? या भीतीने ते हादरले असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु आश्चर्य म्हणजे आपल्या स्टेटसमध्ये त्यांनी ठपका भाजपावर किंवा कोण्या नेत्यावर ठेवला नसून आपले सहकारी अधिकारीच आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी भीती व्यक्त केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. वाझे यांचा रोख कुणाकडे आहे हे स्पष्ट व्हायला हवे. पोलिस दलातला कोणताही अधिकारी वरीष्ठांच्या आदेशाशिवाय हलू देखील शकत नाही. अँटालिया प्रकरणात वाझेंची भूमिका नेमकी काय होती आणि त्यांना कोणाचे आदेश होते हे सत्य एनआयए आणि एटीएसच्या चौकशीत समोर यायला हवे. नाकाच्यावर पाणी गेल्यानंतर माकडीण आपल्या पिल्लांना पण पायाखाली घेते हे यापूर्वी अनेक प्रकरणात दिसले आहे. आपल्याबाबत असेच घडण्याची शक्यता वाझेंना वाटते आहे काय? वाझेंची चूक सिद्ध झाली तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी, पण केवळ त्यांचा बळीचा बकरा करून या प्रकरणातले सूत्रधार मोकाट राहीले तर तो न्याय होणार नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा