28 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरसंपादकीयएकनाथ शिंदेच्या बंडाची खेळी नेमकी कुणाची..

एकनाथ शिंदेच्या बंडाची खेळी नेमकी कुणाची..

Google News Follow

Related

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शिवसेनेचे सुमारे ४० आमदार गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. महाविकास आघाडीचा कधीही गेम होईल अशी चर्चा आहे. परंतु ही चर्चा सुरू असताना हा गेम नेमका कुणाचा याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. ही खेळी अन्य कुणाची नसून खुद्द मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामागे आहेत अशा वावड्या गेले दोन दिवस जोरात आहेत. प्रत्यक्षात सत्य काय?

हा प्रश्न पत्रकारांनी थेट संजय राऊत यांना विचारला होता. पण उद्धव ठाकरे हे मागून वार करणारे राजकारणी नाही, असे डावपेच त्यांच्या रक्तात नाहीत असे उत्तर देऊन त्यांनी ही शक्यता फेटाळली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीचा पाश आवळला जात होता. त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ईडीच्या रडारवर होते. अलिबागच्या बंगल्यांचे प्रकरणात थेट रश्मी ठाकरे यांचे नाव आले होते. उदय शंकर महावर या हवाला ऑपरेटरशी असलेल्या संबंधांमुळे ते अडचणीत आले होते. शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या जाळ्यात सापडले होते. प्रताप सरनाईक यांनी या सगळ्या तापाला कंटाळून मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्राचा विषय तर मीडियामध्ये गाजला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गुंत्यातून सुटका करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पुढे करून खेळी केली, अशा पुड्या सोडण्याचे काम सध्या बरेच जण करतायत. अर्थात या थिअरीमध्ये बरेच कमकुवत दुवे आहेत.

अशा प्रकारचा बनाव उद्धव ठाकरे आणि त्यांचे सल्लागार रचू शकतात का? तेवढी क्षमता असलेले राजकीय सल्लागार त्यांच्याकडे आहेत का? जर असतील तर मग राज्यसभा आणि विधान परीषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा बाजार का उठला? स्वत: संजय राऊत हे स्वत: राज्यसभा निवडणुकीत बालंबाल बचावले. शिवसेना फोडणे ही उद्धव ठाकरे यांची खेळी असती तर त्यासाठी त्यांनी रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू असा ऐकणारा नेता निवडला असता. शिंदे हे कधीच उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये मोजले जात नव्हते. त्यामुळे मुळातच ही थिअरी बोगस आणि बिनबुडाची आहे. विधान परीषद निवडणुकीआधी शिवसेनेचे सर्व आमदार ट्रायडण्टमध्ये असताना एकनाथ शिंदे आणि युवराज आदीत्य ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती, मीडियामध्येही याचा बभ्रा झाला होता. त्यामुळे ही उद्धव यांची खेळी आहे, हा कुडमुड्या राजकीय विश्लेषकांचा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे.

राजकीय खेळी रचणे हे विश्वासघात करण्या इतके सोपे थोडेच असते. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटर प्रोफाईलवरून मंत्री पदाचा उल्लेख काढला ते काही पदाचा मोह नाही म्हणून नाही, तर सत्ता आता टीकणार नाही याची खातरजमा झाल्यामुळे घेतलेले हे निर्णय आहेत. ‘वर्षा’ सोडली तरी उद्धवजींनी राजीनामा दिला नाही तो या मोहापायीच.

संजय राऊत हे अजूनही मैदानात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी २१ आमदार मुख्यमंत्र्यांच्या थेट संपर्कात असून महाविकास आघाडी सभागृहात आपले बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. परंतु हे विधान करताना आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो तुम्ही २४ तासांत हजर व्हा असा आवाहन वजा दम त्यांनी संजय राऊत यांनी शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना दिला आहे. राऊत यांच्या विधानांमध्ये विरोधाभास आहे. मविआमधून बाहेर पडले तर सभागृहात बहुमत सिद्ध कसे करणार? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याशिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेना जादूचे प्रयोग करणार आहे का? परंतु हा विरोधाभास फक्त राऊतांच्या विधानात नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा गोंधळलेले दिसतात. मविआ सरकारला कोणताही धोका नाही असे सांगताना आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असे परस्पर विरोधी दावे त्यांनी एकाच दमात केले आहेत.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार, यादी जाहीर

… तर मविआतून बाहेर पडू- राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

एकीकडे संजय राऊत हे दिवसभर मीडियासमोर दावे-प्रतिदावे करीत असताना शिंदे गट मात्र शांत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनेने ओथंबलेले फेसबुक लाईव्ह केल्यानंतर शिवसेनेचे आणखी सहा आमदार गुवाहाटीला रवाना झाले. शिवसेना आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करते आहे. मुख्यमंत्री सहपरीवार वर्षावरून बाहेर पडताना शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठी माध्यमांना हाताशी धरून वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला. पण यातून काही साध्य होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील सरकार वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू असे दावे करतायत. पण कोणाच्याच चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदारी पदरात पाडून घेणाऱ्या एकनाथ खडसे यांनी विधान परीषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेले सगळे सत्कार सोहळे रद्द केले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांची मानसिकता स्पष्ट करण्यासाठी हे एवढेच उदाहरण पुरेसे आहे. मी राजीनामा द्यायला तयार असे सांगून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा खिशात सारला आहे. हा राजीनामा सहजासहजी खिशातून बाहेर येण्याची शक्यता शून्य. याचा फैसला आता राजभवन आणि सभागृह या दोन जागीच होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी मविआची सत्ता हायजॅक केली. आता ते पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. हे जर प्रत्यक्षात आले तर शिवसेनेची स्थिती गाढव गेले आणि ब्रह्मचर्य़ही गेले अशी होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा