हिंसक संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने युद्धबंदी कायम ठेवण्यास सहमती दर्शविली आहे, अशी घोषणा तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. सर्व पक्षांनी शांतता राखण्यासाठी आणि उल्लंघन करणाऱ्या पक्षावर दंड आकारण्यासाठी एक देखरेख आणि पडताळणी यंत्रणा बसवण्यास सहमती दर्शविली आहे, असे तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. हा संघर्ष काही प्रमाणात शमताना दिसत आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर तालिबान प्रशासनानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासंदर्भात (सीजफायर) सहमती झाली आहे. यासाठी तुर्की आणि कतार यांनी मध्यस्थी केली.
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या एका संयुक्त निवेदनानुसार, १८ आणि १९ ऑक्टोबरला दोहा येथे प्राथमिक स्तरावर युद्धविरामासंदर्भात सहमती झाली होती. यानंतर २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेत या कराराला अधिक बळकटी देण्यासाठी तुर्की आणि कतार यांनी मध्यस्थी केली. चर्चेदरम्यान सर्व पक्षांनी युद्धविरामाला बळकटी देण्यावर भर दिला आणि युद्धविरामाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र मॉनिटरिंग यंत्रणा तयार करण्यावर एकमत झाले.
दरम्यान, तालिबानचे कार्यवाहक गृहमंत्री खलिफा सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानला त्यांचे अंतर्गत संघर्ष अफगाणिस्तानवर लादण्याविरुद्ध इशारा दिला आहे. शिवाय त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रयत्नांमुळे पाकिस्तान्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) बाबत हा इशारा देण्यात आला, ज्यामध्ये इस्लामाबादला त्यांचे प्रश्न देशांतर्गत सोडवावेत आणि ते अफगाणिस्तानवर लादू नयेत असे आवाहन करण्यात आले.
हे ही वाचा:
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
खोकला किंवा दम्यावर काय आहे रामबाण ?
मोहनलाल यांची कन्या ‘थुडक्कम’ चित्रपटातून करणार पदार्पण
“आपल्या भूभागाचे रक्षण करणे हे आपल्या प्राधान्यांपैकी एक आहे. तरीही हे सर्व असूनही, समजूतदारपणाचा मार्ग खुला आहे. परंतु जर कोणी आक्रमकता केली तर आपल्या भूभागाचे रक्षण करणे आपल्यासाठी कठीण नाही,” असे हक्कानी यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “समस्या तुमची आहे. तुमच्याकडे उपाय आहे. मग तुम्ही ती आमच्याशी का जोडता? एकीकडे, आपले हित जपण्यासाठी, एक देश दुसऱ्या देशाच्या भूभागाचे उल्लंघन करतो; परंतु अफगाण लोकांनी युद्धभूमीवर स्वतःला सिद्ध केले आहे आणि जर आमच्या सहनशीलतेची पुन्हा परीक्षा झाली तर आमचा प्रतिसाद खूपच क्रूर असेल,” असे ते पुढे म्हणाले.







